
राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा
मुंबई : राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असून, राज्यसभेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार, यावर अजूनही एकमत झालेले नाही. राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. शरद पवार मोठे नेते, पण आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी व्यक्त केली.
गुरुवारी रात्री पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. मात्र, स्वतःचा निर्णय न सांगता पवारांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून एकमताने भूमिका ठरवावी, असा सल्ला दिल्याचे समजते. यंदा देशभरात ३७ राज्यसभा जागा रिक्त होत असून, त्यापैकी ७ जागा महाराष्ट्र राज्यातील आहेत. विद्यमान संख्याबळानुसार महायुतीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास त्यांना एक जागा मिळू शकते. पवारांसह फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपत असून, १६ मार्चला निवडणूक होणार आहे.
हेदेखील वाचा : शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत हालचाली सुरू केल्या आहेत. त्या मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच जयंत पाटील व शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. काँग्रेसने राज्यसभेची जागा स्वतःकडे ठेवून मे महिन्यातील विधान परिषद जागा शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. ठाकरे पुन्हा परिषदेत जाणार की इतरांना संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंची बैठकीला दांडी?
महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे यांना दोनवेळा राज्यसभेच्या बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र, आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत. राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत. महाविकास आघाडी म्हणून विधानभवनात बैठक बोलावण्यात आली. मात्र, या बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी बैठकीला दांडी मारली आहे.
आमचा दावा सोडणार नाही : सरदेसाई
राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपले मत मांडले आहे. सन २०२० साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार दिलेले असताना आणि संख्याबळ असताना सुद्धा ते पराभूत झाले. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.
शरद पवारांनी निवडणूक लढवावी
आम्ही काही प्रमुख लोक एकत्र बसलो होतो आणि आमच्या वतीने आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे. जशी काँग्रेस आणि शिवसेनेने मागणी केली आहे, तशीच आमचीही विनंती आहे की पवार साहेबांनी ही निवडणूक लढवावी.
– शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी नेते, शरद पवार गट