
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी
धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंड करत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर पक्षांतर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा दावा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे दोन खासदार काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आले. यावेळी पक्षांतरविरोधी कायद्याशी संबंधित तरतुदी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या सहा खासदार गेल्यामुळे दोन तृतीयांश संख्या पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र केवळ दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले म्हणून पक्षांतर आपोआप वैध ठरत नाही.”
२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे
त्यांच्या मते, पक्षांतरविरोधी कायद्यानुसार केवळ सदस्यांची संख्या पुरेशी नसून मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या प्रक्रियेचा आधार घेतच लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली. “सहा जणांचा आकडा पूर्ण होईपर्यंत त्यांनी थांबून नंतरच निर्णय घेतला,” असा आरोप करत त्यांनी बंडखोरी पूर्वनियोजित असल्याचा दावा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ते खासदार फुटू शकत नाहीत. कारण कायदा असं सांगतो, जरी दोन तृतीयांश खासदार इकडचे तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाहीत. पक्षात विलीन होऊ शकत नाहीत. कारण पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो. आणि त्याला खासदारांनी दोन तृतीयांश पाठिंबा द्यावा लागतो. आता पाहुयात ओम बिर्ला काय करतायेत,” असे ते म्हणाले.
धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
बंडखोर खासदारांविरोधात अपात्रतेची मागणी करण्यात आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.