२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाण्याची आणि कदाचित पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहेत. सध्या पंतप्रधानांनंतर पुढचा चेहरा कोण असेल, यावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून खासदारांची फोडाफोडी त्याचाच भाग असल्याचा आरोप शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
धाराशिव येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, “फुटलेले खासदार फडणवीसांकडे जाऊ नयेत, तर आपल्या गटात राहावेत यासाठी ही चढाओढ सुरू आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील खासदारही फोडण्यात आले. ज्या पक्षाचे नावही लोकांना माहीत नाही, अशा पक्षात त्यांना पाठविण्यात आले. हा संपूर्ण फोडाफोडीचा खेळ २०२९ मध्ये कोण पंतप्रधान होणार यासाठी सुरू आहे.”
पश्चिम बंगाल निवडणुकीत अडीच लाख सैन्य तैनात केल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी तेवढेच सैन्य पाठविण्याची हिंमत दाखवा. त्यासाठी हा ठाकरे तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील. गद्दारांचा पाठिंबा घेण्याची गरज नाही.”
धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेना संपविण्याचे अनेक प्रयत्न झाले, ४० आमदार फोडले गेले, त्यानंतरही नऊ खासदार निवडून आले. आता त्यातील सहा जण पक्ष सोडून गेले असले तरी शिवसेना संपणार नाही, असा दावा त्यांनी केला.
“जोपर्यंत जनता आमच्यासोबत आहे आणि बाळासाहेब ठाकरे लोकांच्या हृदयात आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. येणाऱ्या काळात हे आम्ही दाखवून देऊ,” असेही ठाकरे म्हणाले. धाराशिवचे खासदार पक्षांतर केल्यानंतर जनतेशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौरा केला असून, त्याच दौऱ्यातील सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी मंचावर आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






