राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?
राज्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना शनिवारी आणखी एक महत्त्वाची घटना घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला एकाच इंडिगो विमानातून प्रवास केला. विमानात भेट होताच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांची विचारपूस केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते. नागपूरला रवाना होताना विमानात झालेली ही भेट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली.
विमानप्रवासानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलक्याफुलक्या शब्दांत, “आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यासाठी विदर्भाकडे रवाना झाले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसही अधिकृत कार्यक्रमासाठी नागपूरला जात होते.
या विमानप्रवासाला राजकीय रंग दिला जात असतानाच भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही बाजूंकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही भेट पूर्णपणे योगायोग असल्याचे सांगितले. दोन्ही नेते आपापल्या नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला जात होते आणि या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकच विमानाने प्रवेश… pic.twitter.com/ySNBRaEoII — Padmesh Pawar || पदमेश पवार (@PawarPadmesh) June 26, 2026
याबाबत बोलताना सुषमा अंधारे आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून म्हणाल्या, “ठाकरे फडणवीस यांनी एकत्र मुंबई ते नागपूर विमान प्रवास केल्याने चर्चांना उधाण येण्याचे काहीही कारण नाही. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड आहे तर उद्धव साहेबांचा आजपासून चा दौरा नियोजित आहे. इंधन बचतीच्या संदर्भाने पंतप्रधानांपासून सगळेच जण बोलत आहेत त्यामुळे नेते खाजगी विमानाने प्रवास करायचे टाळत असतील तर तर या मागचे कारण निव्वळ राष्ट्रहित आहे..!”
‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
मात्र, अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या विमानप्रवासाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणते घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.






