
अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी दौऱ्यातून पुन्हा एकदा भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना त्यांनी खासदार फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचा आरोप केला. तसेच, “देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर,” अशी प्रार्थना आपण साईबाबांच्या चरणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 2029 नंतर देशात पंतप्रधानपदासाठी नवे चेहरे पुढे येऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं नावही चर्चेत येऊ शकतं. त्यामुळेच त्यांना राज्यातच अडकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचा राजकीय प्रभाव मर्यादित करण्यासाठी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, शिवसेनेतील खासदार फोडण्यामागेही हाच मोठा राजकीय डाव असून, आता शिंदे गटाकडे भाजपपेक्षा अधिक खासदार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. “हे भाऊसाहेब नाहीत, तर खाऊसाहेब आहेत,” असा टोला लगावत त्यांनी वाकचौरे यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 2009 मध्ये शिवसेनेने त्यांना निवडून आणले, 2014 मध्ये त्यांनी पक्ष सोडला, पुन्हा परत आले आणि आता पुन्हा पक्षत्याग केला. “थोडा संयम ठेवला असता तर भविष्यात आपलंच सरकार आलं असतं,” असेही ठाकरे म्हणाले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर पैशांच्या जोरावर राजकारण केल्याचा आरोप केला. “जनतेच्या कराच्या पैशातून विकास करायचा सोडून खासदार फोडण्यासाठी पैसा वापरला जात आहे,” असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचाही उल्लेख करत, “शेतकऱ्यांकडे बैल नाहीत, त्यांच्या पत्नी नांगर ओढत आहेत; पण सरकारकडे मात्र खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत,” अशी टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंख छाटले” हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मराठी भाषेच्या ज्ञानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फडणवीस यांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावे लागत असल्याचा दावा करत, “संघाचा पाठिंबा फडणवीस आणि नितीन गडकरी यांना आहे,” असेही ते म्हणाले.
सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आत्मविश्वास व्यक्त केला. “आज परिस्थिती वेगळी असली तरी पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रात पुन्हा आपले सरकार येऊ शकते. खासदारांचे जाणे हा पराभव नसून भविष्यासाठी शुभ संकेत आहे,” असे ते म्हणाले. .त्यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन करत, “श्रद्धा आणि सबुरी ठेवा, योग्य वेळी जनताच उत्तर देईल,” असा विश्वास व्यक्त केला.