
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ... आता कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याअंतर्गत धाराशिवमध्ये आयोजित सभेत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली.
“उद्धव ठाकरे फिरत नाहीत म्हणणाऱ्यांनी आता महाराष्ट्र पाहावा. या सभा नसून माझ्या कौटुंबिक बैठका आहेत. कितीही आमदार-खासदार फोडले तरी तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही,” असे ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील एका प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, एका गरीब शेतकऱ्याने बंडखोर खासदाराच्या प्रचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्या खासदाराने जनतेशी संपर्क ठेवला नाही, असा आरोप त्यांनी केला.
‘शिंदे राम तर फडणवीस लक्ष्मण’; खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी
भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. “खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची उदाहरणं देणारे तुम्हीच होता. आता तुमच्या कपाळावर लागलेला ‘गद्दार’ हा शिक्का कधी पुसणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणशैलीची नक्कल करत, “मी त्यांना वाघ समजलो होतो, पण ते वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे निघाले,” अशी टीकाही केली.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचा दावा केला. “हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र आहे,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही भाष्य केले.
त्यांनी दावा केला की, भविष्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकणाऱ्या नेत्यांना रोखण्यासाठीच काही राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या संदर्भातील दाव्यांना कोणतेही अधिकृत पुष्टीकरण उपलब्ध नाही.
सभेत आमदार कैलास पाटील यांनी, “काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिकांसोबत राहीन,” अशी भूमिका मांडली.
‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा
सभेत खासदार संजय राऊत यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी निंबाळकर यांच्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच विविध कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत ते शिंदे गटात गेले असल्याचा दावा केला.
राऊत यावेळी म्हणाले, “हा भामटा का गेला? कारण त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. आता मला असेही वाटत आहे कि त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे. त्या खुनामागेदेखील वेगळं काहीतरी रहस्य आहे. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट अक्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला. हा घाबरून शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसे खाल्ले, असे अनेक गुन्हे केले म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेला. 15-20 वर्ष एका सापाला दूध पाजले होते पण आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली आहे,” असे राऊत म्हणाले.