
“२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं”; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमधील जबाबदारीबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भाजपच्या वरिष्ठ समितीत नियुक्ती करण्यात आली असावी. कोणाला कोणत्या पदावर किंवा समितीत घ्यायचे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
मात्र, यानंतर त्यांनी फडणवीसांबाबत महत्त्वाचे विधान केले. “आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पूर्वी पंतप्रधान व्हावे. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भाजप त्यांना किती काळ थांबवणार किंवा पुढे नेणार, हे पाहायला मिळेल,” असे वडेट्टीवार म्हणाले.
खुले खाद्यतेल विक्रीबाबतच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. खुले तेल विक्रीवरील बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि तो रद्द करण्यात येत असेल तर त्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी घेतलेला हा निर्णय मंत्रिमंडळाने रद्द केल्यास तो चांगला निर्णय ठरेल, असे सांगतानाच आपण यासंदर्भात यापूर्वीही मागणी केली होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
खुले तेल विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय तेली समाजावर अन्याय करणारा होता. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक त्यांच्या आर्थिक गरजेनुसार खुले तेल खरेदी करतात. जनतेतून झालेला विरोध लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करण्यात आला असावा, असेही त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, कोणता मंत्री त्यांच्याकडे जातो किंवा कोण जात नाही, याच्याशी आपले देणेघेणे नसल्याचे ते म्हणाले. “आमची भूमिका स्पष्ट आहे. जातनिहाय जनगणना करा आणि आमच्या वाट्याचे आम्हाला द्या,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
काही नोंदी किंवा प्रमाणपत्रे बोगस असतील तर ती न्यायालयात टिकणार नाहीत. संविधान आणि न्यायाच्या चौकटीत बसणारे निर्णयच टिकतील. केवळ कोणीतरी मागणी केली म्हणून घेतलेला निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकेलच असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. एका कार्यक्रमाच्या मंचावर आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीने मराठीतून आपल्या समस्या मांडल्या. तिच्या वक्तव्यातून आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे समोर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः आदिवासी विद्यार्थिनींबाबत अविश्वास दाखवला जात असल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.
या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून मुख्यमंत्री या विषयाला प्राधान्य देतील आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांना काँग्रेसने विरोध केलेला नाही आणि राहुल गांधी तरुणांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांसोबत उभे राहण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यामुळे अशा आंदोलनांना प्रतिसाद मिळत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राहुल गांधी यांनी नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी होकार दिला आहे. मात्र कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आरक्षण संपणार नसल्याच्या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. “राजनाथ सिंह बरोबर बोलले की आरक्षण संपणार नाही. मात्र त्यांचा इशारा नेमका कोणाला होता, हे त्यांनी सांगावे,” असे ते म्हणाले. भाजपमधीलच काही नेते आरक्षणाबाबत वेगवेगळी विधाने करतात. त्यामुळे भाजपची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. आठवले यांना त्यांच्या राजकीय आघाडीत एका नगरसेवकाची जागाही मिळत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. “जिथे खुर्ची मिळते तिथे ते पळतात. ते काँग्रेसला काय सांगणार?” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आठवले यांच्यावर टीका केली.
एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना दुसरीकडे भाजपच्या आरक्षणविषयक भूमिकेवर टीका केल्याने विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे.