
मुंबईत विठ्ठल रखुमाईचं प्राचीन मंदिर आहे. ज्याला कित्येक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. मंदिर तसं साधंच पण त्याचं महत्व जास्त आहे ते तुकोबांनी मंदिराचा पाया रचल्यामुळे. याची गोष्ट अशी सांगितली जाते की, मीठाच्या व्यापारासाठी तुकोबा मुंबईत येत असत. असं म्हणतात की या परिसरात मंदिर बांधण्याआधी वडाचं झाड होतं या वडाच्या झाडाखाली बसून तुकोबांनी किर्तन केलं होतं. या ठिकाणी पुर्वी वडाची झाडं होती त्यामुळे मुंबईतल्या या परिसराला वडाळा असं नाव पडलं. सुमारे 400 तुकोबांनी या मंदिराचा पाया रचला.
या मंदिराला जितकं महत्व आहे तेवढंच तेथील विठ्ठल मूर्तीची गोष्ट देखील खास आहे. पुर्वीच्या काळी मुघलसाम्राज्य हिंदू देवतांची विटंबना करित म्हणून देवांच्या मुर्त्या कोणी जमिनीत पुरुन ठेवत तर कोणी पाण्यात सोडून देत होते. असं म्हणतात की, वडाळा परिसरातील एक गृहस्थ पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते.त्यावेळी चंद्रभागेच्या तिरावर त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती सापडली. त्यानंतर या मुर्तीची स्थापना मुंबईत करण्यात आली. त्याचबरोबर आणखी दुसरी गोष्ट अशी देखील सांगितली जाते की, वडाळ्याच्या मिठागरात काम करणाऱ्या कामगारांना विठ्ठलाची मूर्ती सापडली तेव्हा स्थानिकांनी या ठिकाणी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. तुकोबांनी ज्या वडाच्या झाडाखाली किर्तन केलं ते वडाचं झाड आजही मंदिरपरीसरात आहे आणि भाविक याची काळजी देखील घेतात.आज या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रतिपंढरपुर म्हणून ओळखलं जातं. इच्छा असूनही वारीला जाऊ शकत नाही असे मुंबईकर या प्रतिपंढरपुरातील विठ्ठालाच्या चरणी नतमस्तक होतात.