
त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ जिल्हास्तरापुरती मर्यादित राहिली नाही, तर २०१२ पासून त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. राज्य कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत त्यांनी किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यासाठी मोलाचे योगदान दिले. किशोरवयीन आरोग्य केंद्रांचे स्वरूप कसे असावे, त्यांचे पर्यवेक्षण कसे करावे आणि जास्तीत जास्त युवकांना याचा लाभ कसा मिळेल, यासाठी त्यांनी आरोग्य शिक्षण साहित्य विकसित केले. लोहयुक्त गोळ्यांची यशस्वी अंमलबजावणी, मानव विकास कार्यक्रम, आणि मासिक पाळी संवर्धन योजना अशा अनेक महत्त्वाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे केंद्र शासनाने महाराष्ट्राचा अनेकवेळा गौरव केला आहे.
कोविड-१९ च्या भीषण जागतिक संकटात डॉ. कमलापूरकर यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करताना पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्या नियोजनात व्यस्त असत. रत्नागिरीत पहिला कोविड रुग्ण आढळला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना धीर दिला आणि प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती हाताळली. स्वतःचे सहकारी बाधित झाले असताना त्यांना स्वतः फोन करून धीर देणे, त्यांना योगासने आणि चांगल्या आहाराचा सल्ला देणे, ही त्यांच्यातील संवेदनशील नेतृत्वाची ओळख आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांचा मृत्यू होताना पाहून त्यांना आलेले वाईट अनुभव असोत किंवा बेड शिल्लक नसताना रुग्णाची सोय करून त्यांना जीवनदान दिल्याचे सकारात्मक प्रसंग असोत, डॉ. कमलापूरकर यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आपली कर्तव्यनिष्ठा जपली.
सध्या त्या राज्यस्तरावर जन्म-मृत्यू नोंदणीसाठी उपमुख्य निबंधक आणि उपसंचालक या जबाबदार पदावर कार्यरत आहेत. नागरिकांना जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र सहजरीत्या उपलब्ध व्हावे, यासाठी त्या अहोरात्र प्रयत्नशील आहेत. सध्या शासकीय रुग्णालयात जन्म झाल्यावर मातेला घरी सोडतानाच प्रमाणपत्र देण्याची सोय राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ ऑक्टोबर २०२३ पासून सुधारित जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम देशभर लागू केला असून, महाराष्ट्रातही नवीन CRS REVAMPED PORTAL द्वारे २४ जून २०२४ पासून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यात आली आहे. नोंदणी विनामूल्य असून ती २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे, याबद्दल त्या सतत जनजागृती करत आहेत. जन्म मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना वेळेत मिळेल यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत.याशिवाय गुलियन बार सिंड्रोम याचे व्यवस्थापनही व याची धुरा त्यांनी सांभाळली आहे.अशा या कर्तबगार महिला अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव करणे, हाच खऱ्या अर्थाने महिला दिनाचा सन्मान ठरेल.