
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ६-६ ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांच्या नावावर आहे. त्यानंतर ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये मुंबईच्या आदित्य तारेचा समावेश होतो. विशेष म्हणजे, केएल राहुल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांसारखे स्टार खेळाडू १०० पेक्षा जास्त सामने खेळूनही अजूनही पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या खेळाडूने फक्त 35 सामन्यात ५ ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.
विकेटकीपर फलंदाज आदित्य तारे २०१३, २०१५, २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघांचा भाग होता. तो चार वेळा मुंबई इंडियन्स कडून खेळला आणि ट्रॉफीचा हकदार ठरला. २०१६ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग बनला आणि त्याने जेतेपद पटकावले होते. त्याच्या ३५ सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने मुंबई आणि हैदराबादव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाचंही प्रतिनिधित्व केले आहे.
आदित्य तारेचे नाव काढले की, २०१४ च्या आयपीएलमधील तो थरारक सामना आठवतो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या चेंडूवर सीमारेषेबाहेर फटका मारणे आवश्यक होते. आदित्य तारेने जेम्स फॉकनरच्या चेंडूवर गगनभेदी षटकार मारला आणि वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. तो षटकार मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यादगार क्षणांपैकी एक मानला जातो.
केवळ आयपीएलच नाही, तर घरगुती क्रिकेटमध्येही आदित्य तारेचे मोठे नाव आहे: त्याने मुंबईचा कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०१ सामन्यांत १० शतकांच्या मदतीने ५,६०८ धावा केल्या आहेत. टी-२० कारकीर्दीत एकूण १३० टी-२० सामन्यांत त्याने २,६३० धावा फटकावल्या आहेत. मुंबईव्यतिरिक्त तो उत्तराखंड संघाकडूनही खेळला आहे. दिग्गज खेळाडू जे स्वप्न पाहतात, ते आदित्यने आपल्या छोट्याशा आयपीएल कारकिर्दीत ५ वेळा जगले आहे.