
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, २०११ मध्ये त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या स्टेडियमवर भारताने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये खेळला होता, ज्यात त्यांनी आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, त्यात घातक गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. नाणेफेकीनंतर भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला जाईल आणि आज संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनची जागा तो घेऊ शकतो, असे वृत्त आहे.