
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने आपल्या शेवटच्या ११ सामन्यांपैकी १० सामने गमावले आहेत. अय्यरने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, या चारही सामन्यात सलग पराभव पत्कारावा लागला आहे. याआधी आयर्लंडविरुद्ध दोन सामने गमावले आणि आता इंग्लंडविरुद्धही सलग दोन सामने गमावले आहेत.
अलिकडच्या सामन्यांमधील भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे भारतीय कर्णधार आणि व्यवस्थापनाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. अय्यरच्या कर्णधारपदाखाली आयर्लंडमध्ये ०-२ ने मालिका गमावल्यानंतर, श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर देखील जोरदार टीका झाली.
आयपीएल २०२६ मध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याने पंजाब किंग्ससाठी हंगामाची सुरुवात धमाकेदार केली, पण शेवटच्या सात सामन्यांपैकी सहा सामने गमावले. आपल्या शेवटच्या सात आयपीएल सामन्यांमध्ये अय्यरची सरासरी ३६.५० राहिली आहे. इतकेच नव्हे तर, भारताच्या पाच सामन्यांमध्ये त्याची सरासरी केवळ २४.६ राहिली आहे.
श्रेयस अय्यरने भारतासाठी १४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून तो १५० सामन्यांचा टप्पा ओलांडण्याच्या जवळ आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण १४ कसोटी, ७९ एकदिवसीय आणि ५६ टी-२० सामने खेळले आहेत.
तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून १२५ धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघाची कामगिरी ‘अत्यंत खराब’ असल्याचे म्हटले आणि एवढा मोठा पराभव ‘अस्वीकार्य’ असल्याचे कबूल केले. अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला अद्याप एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही. तिसरा सामना संघासाठी खूप निराशाजनक होता. २०२ धावांचा पाठलाग करताना, संघ अवघ्या ११.४ षटकांत ७६ धावांवर सर्वबाद झाला, जो या फॉरमॅटमधील धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.