IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. लीड्स येथे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर, भारतीय संघ आता पुनरागमन करू इच्छितो. लीड्समध्ये भारताने पाच शतके झळकावली. त्यानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने १९६७ ते २०२२ पर्यंतच्या काळात एजबॅस्टनमध्ये आठ कसोटी सामने खेळले असून या मैदानावर त्यांना कधीही विजय मिळवता आलेला नाही. १९८६ मध्ये एकदा सामना अनिर्णित राहिला होता, परंतु त्याव्यतिरिक्त, आकडेवारी नकोशी राहिली आहे. या काळात एजबॅस्टन येथे भारताच्या फलंदाजांनी शतके झळकावली असली तरी देखील त्यांना विजय मिळाला नाही. एजबॅस्टनमध्ये शतक लगावणाऱ्या खेळाडूंबद्दल माहिती घेऊ.(फोटो-सोशल मीडिया)
भारताचा इंग्लंड दौरा १९९६ : प्रथम फलंदाजी करताना भारताने २१४ धावा केल्या. प्रतिउत्तरात नासिर हुसेनच्या शतकामुळे इंग्लंडने ३१३ धावा केल्या. दुसऱ्या डावात तेंडुलकरच्या १२२ धावांच्या जोरावर भारताने २१९ धावा केल्या, इंग्लंडने फक्त १२१ धावांचा पाठलाग करून सहज विजय मिळवला.
भारताचा इंग्लंड दौरा, २०१८ : प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २८७ धावा उभारल्या, ज्यामध्ये रविचंद्रन अश्विनने चार विकेट घेतल्या. विराटच्या १४९ धावांच्या जोरावर भारताने २७४ धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने फक्त १८० धावा केल्या, ज्यामध्ये इशांत शर्माने पाच विकेट टिपल्या.
बेन स्टोक्सच्या चार विकेट्स २०१८ : भारताला विजयासाठी १९४ धावा आवश्यक होत्या, पण कोहलीच्या ५१ धावा असूनही, बेन स्टोक्सच्या चार विकेट्समुळे संघ १६२ धावांवर गारद झाला. आजपर्यंत, एजबॅस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात विराट हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने दोन सामन्यात ५७.७५ च्या सरासरीने २३१ धावा केल्या आहेत.
भारताचा इंग्लंड दौरा, २०२२ : प्रथम फलंदाजी करतांना भारताने ऋषभ पंतच्या १४६ आणि रवींद्र जडेजाच्या १०४ धावांच्या जोरावर ४१६ धावा केल्या होत्या, तर जेम्स अँडरसनने पाच बळी घेतले. उत्तरात, जॉनी बेअरस्टोच्या शतकानंतरही इंग्लंडचा संघ २८४ धावांवर गडबडला. मोहम्मद सिराजने चार बळी टिपले होते.
भारताचा इंग्लंडकडून पराभव, २०२२ : दुसऱ्या डावात, भारताचा संघ २४५ धावांवर गारद झाला. ज्यामध्ये स्टोक्सने चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, जो रूट आणि बेअरस्टोच्या शतकांमुळे इंग्लंडने सहज विजय मिळवला.