टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले आणि बाप्पासमोर नतमस्तक झाले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 96 धावांच्या विक्रमी फरकाने पराभूत करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. सलग दोनदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला देश ठरला. या सामन्यात टीम इंडियाने संघ म्हणून खतरनाक परफॉर्मन्स केला.
संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. त्यांनी ग्रुप अ मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि नंतर सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवून उपांत्य फेरी गाठली. सुपर 8 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाली. त्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली चूक मान्य केली आणि अक्षर पटेलला त्या सामन्यातून वगळणे ही आपली चूक असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास सोपा नव्हता. सुपर 8मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना बराच ताण सहन करावा लागला. पहिल्याच टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर संघावर प्रचंड दबाव होता. पण भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवले आणि नंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास रचला. या विजयासह, भारत तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.
भारत तीन टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आणि सलग दोनदा ट्रॉफी जिंकणारा पहिला संघही बनला; भारताने यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चे विजेतेपद जिंकले होते. गंभीर प्रशिक्षक असताना भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद होते. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून संघाने २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.






