इस्रायल हमास युद्धामुळे इस्रायलमध्ये बांधकामं रखडली, भारतातून एक लाख कामगार पाठवण्याची मागणी!

इस्रायलमध्ये अनेक पॅलेस्टिनी कामगार काम करतात, मात्र हमासच्या हल्ल्यानंतर कंपन्यांनी या कामगारांना काढून टाकले. त्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये बांधकामे ठप्प झाली आहेत. काही चिनी कामगार तिथे काम करत असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे.

    पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) आज एक महिना पुर्ण झाला आहे आहे. अजुनही इस्रायलने हमासवर हल्ले करणं थांबवलेलं नाही. या युद्धाची झळ संपुर्ण इस्रायलला बसली असून बांधकाम क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी काम रखडल्यामुळे इस्रायलने भारताला तातडीने एक लाख बांधकाम कामगार पाठवण्याची विनंती केली आहे. अमेरिकन मीडियानुसार, इस्रायली बांधकाम कंपन्यांनी त्यांच्या सरकारकडे एक लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची परवानगी मागितली आहे.

    नेमकं काय कारण?

    इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात अनेक पॅलेस्टिनी कामगार काम करताता, मात्र हमासच्या हल्ल्यानंतर कंपन्यांनी या कामगारांना काढून टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये बांधकामे ठप्प झाली आहेत. काही चिनी कामगार तिथे काम करत असले तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे इस्रायलमधील बांधकाम कंपन्यांनी त्यांच्या सरकारकडे एक लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांना पॅलेस्टिनी कामगारांच्या जागी ठेवण्यात येईल.अशा परिस्थितीत, इस्त्रायली सरकार आणि कंपन्या त्याच गतीने बांधकाम उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी भारताकडे उत्सुक आहेत.

    इस्रायल सरकारने यापूर्वीच केला करार

    इस्रायल सरकारने भारतीय कामगारांना तिथे कामावर ठेवण्याचा करार आधीच केला आहे. मे महिन्यात भारत भेटीवर आलेले इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत भारतातून ४२ हजार कामगारांना इस्रायलला पाठवले जाणार आहे. त्यापैकी 34 हजार बांधकाम क्षेत्रासाठी असतील. इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात भारतीय कामगार काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.