
मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजावर थेट गोळीबारच...
तेहरान : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) भारताकडे निघालेल्या 14 मालवाहू जहाजांच्या मोठ्या ताफ्याला जबरदस्तीने अडवल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान इराणी गनबोट्सनी दोन जहाजांवर थेट गोळीबार केला, ज्यामुळे एका भारतीय टँकरची विंडशील्ड फुटली. ही घटना ओमानच्या ईशान्येस सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशम आणि लारक बेटांच्या दरम्यान घडली. जहाजांचा ताफा सुरळीतपणे प्रवास करत असताना दोन इराणी गनबोट्सनी त्यांना घेरले आणि पूर्वसूचनेशिवाय गोळीबार सुरू केला. ज्या जहाजावर हल्ला झाला, ते कच्चे तेल घेऊन जात होते. या हल्ल्यानंतर, १३ जहाजांना आपला प्रवास सोडून पर्शियन आखातातील आपापल्या गंतव्यस्थानी परतण्यास भाग पडले.
दरम्यान, या तणावपूर्ण नाकेबंदीच्या दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी कच्चे तेल घेऊन जाणारे एक भारतीय जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यात यशस्वी झाले. ते आता भारताच्या दिशेने निघाले आहे. उर्वरित १३ जहाजे सध्या लारक बेटाच्या दक्षिणेला अडकली आहेत.
भारताचा ध्वज असूनही अडवणूक
अडवलेल्या १४ जहाजांपैकी सात जहाजांवर भारतीय ध्वज होता, तर उर्वरित जहाजे लायबेरिया, मार्शल बेटे आणि व्हिएतनामची होती. यापैकी सहा जहाजे कच्चे तेल, तीन जहाजे एलपीजी गॅस आणि चार जहाजे खत घेऊन जात होती. या जहाजांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.
शस्त्रसंधी पुढील आठवड्यात संपणार
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी पुढील आठवड्यात संपणार आहे. जोपर्यंत अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी कायम ठेवली आहे, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कडक नियंत्रण ठेवणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. जगातील एक-पंचमांश तेल व्यापार याच मार्गातून होतो.
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद
अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) पुन्हा विकोपाला पोहोचला आहे. शनिवारी (दि.१८) इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या सागरी चाचेगिरी(लूटमार)ला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे.