Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे ६०० शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा १,२८२ वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
नेपाळमध्ये (Nepal flood) निसर्गाच्या भीषण प्रकोपाने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे देशातील अनेक शहरे आणि गावे उध्वस्त झाली आहेत. या भीषण आपत्तीत सर्वात मोठा फटका रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांना बसला असून, येथे शिकणारी सुमारे ६०० हून अधिक शाळकरी मुले आणि त्यांचे शिक्षक एकाएकी गायब झाले आहेत. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनग आणि कडे कोसळल्यामुळे (Ice-rock avalanche) भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना अचानक प्रचंड पूर आला. पुराच्या या रौद्ररुपाने अवघ्या काही मिनिटांतच परिसर जलमय केला, ज्यामध्ये अनेक शाळा, घरे आणि रस्ते वाहून गेले.
स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, एकट्या रसुवा जिल्ह्यातून सुमारे २८० मुले आणि शेजारच्या नुवाकोट जिल्ह्यातून ३०० ते ३५० विद्यार्थी बेपत्ता आहेत. यामध्ये नुवाकोटमधील विदूर नगरपालिकेतूनच जवळपास २५० मुलांची नोंद बेपत्ता म्हणून झाली आहे. अनेक भागांतील दळणवळण, मोबाईल नेटवर्क आणि वीज यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे प्रशासनाला अचूक आकडेवारी जमा करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी वाचलेले आई-वडील आपल्या लहान मुलांचा शोध घेत आहेत, तर काही ठिकाणी बचावलेली मुले आपल्या आई-वडिलांना शोधत रडत भटकत आहेत, असे अत्यंत हृदयद्रावक चित्र निर्माण झाले आहे.
या पुराचा सर्वात भीषण दणका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील किमान २२ शाळांना या पुराचा थेट फटका बसला असून, त्यापैकी १२ शाळांच्या इमारती पूर्णपणे जमिनीदोस्त किंवा वाहून गेल्या आहेत. नीलकंठ माध्यमिक शाळेतील ४९६ विद्यार्थ्यांपैकी सुमारे २०० विद्यार्थी आणि चार कर्मचारी बेपत्ता आहेत. याशिवाय, त्रिभुवन त्रिशुली शाळेच्या १४ इमारती चिखल आणि ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत, तर रामचंद्र शाळेच्या ५ इमारती पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर
या आपत्तीत केवळ मुलेच नव्हे तर २५ हून अधिक शिक्षक आणि शालेय कर्मचारीही बेपत्ता झाले आहेत. रसुवा येथून १६ आणि नुवाकोट येथून ६ शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षक गोसाईकुंड येथे तीर्थयात्रेसाठी गेले असताना अचानक आलेल्या या जलप्रलयात सापडले. आंतरराष्ट्रीय संस्था युनिसेफच्या (UNICEF) प्राथमिक अंदाजानुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे १७,००० हून अधिक मुलांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
नेपाळ पोलीस आणि सुरक्षा दलांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरातून एकूण १,२८२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये चितवनमधून ३५९, नवलपरासी पूर्वमधून २१८, नवलपरासी पश्चिममधून २०८, नुवाकोटमधून १८५ आणि रसुवामधून १४० मृतदेह हाती आले आहेत. याशिवाय ४,७०० हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता असून नेपाळी सेना, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाची संयुक्त पथके दुर्गम डोंगराळ भागात सतत शोधमोहीम राबवत आहेत. आत्तापर्यंत १२,००० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून त्यांना तात्पुरत्या मदत शिबिरांमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
या संपूर्ण भयाण वातावरणात एका आशेचा किरणही पाहायला मिळाला. आपत्तीच्या १० व्या दिवशी त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या ढिगाऱ्याने पूर्णपणे बंद झालेल्या एका बोगद्यातून संजय शाह आणि कबीर महर्जन या दोन कामगारांना बचाव पथकाने जिवंत बाहेर काढले. या मानवी संकटाच्या काळात भारतानेही शेजारी धर्माचे कर्तव्य बजावत मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. भारताकडून नेपाळला आवश्यक औषधे, अन्नधान्य, वाटप साहित्याची मदत सातत्याने पाठवली जात आहे.






