(फोटो सौजन्य-AI एआय)
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला घरोघरी दीड दिवसाच्या कान्होबांची स्थापना करण्याची परंपरा असलेल्या जिल्ह्यात बालकृष्णाच्या आकर्षक मूर्तीना मागणी वाढली असून, मूर्तिकारांकडून मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग सुरू आहे. लाह्या, फुटाणे, पूजासाहित्यापासून बाळकृष्णाचे पाळणे, मोरपीस, वस्त्रे, बासरी, मुकुट, सजावटीच्या माळा, विद्युत रोषणाई आणि राधाकृष्णाच्या वेशभूषेपर्यंत विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा कृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी साजरी होत आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा असल्याने शुक्रवारी रात्री मंदिरांपासून घराघरांपर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांच्या कामाला वेग आला. विविध आकार, रंग आणि आकर्षक वेशभूषेतील बालकृष्णाच्या मूर्ती तयार करण्यात येत असून, काही मूर्तीवर रंगकाम आणि सजावटीचा अखेरचा हात फिरविला जात आहे. घरगुती स्थापनेसाठी लहान आकाराच्या मूर्तीना विशेष मागणी असून, मुकुट, मोरपीस, बासरी आणि आकर्षक वस्त्रांनी सजविलेल्या मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कान्होबा हा घराघरातील जिव्हाळ्याचा उत्सव मानला जातो. त्यामुळे मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढली. सकाळपासून सायंकाळपर्यंत मूर्ती आणि पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये खरेदीची लगबग सुरू आहे.
सजावटीच्या साहित्यावर भर : बालकृष्णाची स्थापना म्हणजे केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना नसून, घरातील छोटेखानी उत्सवाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे देवघर किंवा कान्होब्याच्या स्थापना स्थळाची सजावट करण्यासाठी विद्युत दिव्यांच्या माळा, रंगीत प्रकाशयोजना आणि विविध सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली. लहान मुलांसाठी राधाकृष्णाच्या वेशभूषेचे साहित्यही पालकांकडून खरेदी केले जात आहे.
शेतकरी कुटुंबांत कान्होब्याला विशेष स्थानः धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात कान्होब्याच्या स्थापनेला विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे. दीड दिवसांच्या पूजनानंतर कान्होब्याच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा उत्सवाला भावनिक वळण मिळते. नवीन वस्त्रे परिधान करून महिला आणि पुरुष कान्होब्याची मूर्ती घेऊन विसर्जनासाठी बाहेर पडतात. अनेक ठिकाणी विविध मोहल्ल्यांमधून एकाचवेळी मूर्ती निघत असल्याने परिसर भक्तिमय होतो. जय कन्हैय्या लाल कीच्या जयघोषासह टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरात विसर्जन मिरवणुका तलाव किंवा नदीकाठाकडे रवाना होतात. दीड दिवस लाडाने पूजलेल्या कान्होब्याला निरोप देताना भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि विरहाची भावना दाटून येते. परंपरेला आधुनिक सजावटीची जोड काळानुसार जन्माष्टमीच्या उत्सवाच्या स्वरूपात बदल होत असले तरी कान्होब्याच्या स्थापनेची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे.
आणि शेतकरी जीवनाशी जवळीक असलेला देव मानला जात असल्याने ग्रामीण भागात त्याच्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे. दीड दिवस कान्होब्याची स्थापना करून घरात भजन, पूजन, कीर्तन आणि जागरण केले जाते. या उत्सवात मोठ्या कर्मकांडापेक्षा भक्तिभावाला अधिक महत्त्व दिले जाते. जसा भाव तसा देव या भावनेतून घराघरांत आपल्या श्रद्धेनुसार बालकृष्णाची पूजा केली जाते. घराघरांत भजन, पूजन आणि मध्यरात्री जन्मसोहळा कान्होब्याची स्थापना झाल्यानंतर घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण होते. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करून बालकृष्णाला पाळण्यात झोका देण्याची परंपरा अनेक कुटुंबांत जपली जाते. पंचामृत अभिषेक, आरती, नैवेद्य आणि प्रसाद वितरणानंतर जन्मसोहळ्या की सांगता केली जाते.
दहीहंडी आणि गोपालकाल्याने उत्सवाला रंगत : जन्माष्टमीनंतर विविध ठिकाणी गोपालकाला आणि दहीहंडीचे आयोजन केले जाते. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसोबतच परिसरातील नागरिकांच्या सहभागातून गोपालकाल्याचे कार्यक्रम रंगतात. काही ठिकाणी दहीहंडीच्या माध्यमातून बालकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण केले जाते. भजन, पूजन, कीर्तन, दहीहंडी आणि गोपालकाला अशा विविध कार्यक्रमांमुळे उत्सवाला सामुदायिक स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे जन्माष्टमीच्या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक उत्साहही वाढताना दिसत आहे.






