
russia becomes second gulf for indian workers 70000 population high salary putin agreement
Indian workers shifting to Russia for jobs 2026 : अनेक दशकांपासून जेव्हा भारतातून बाहेर पडून पैसे कमावण्याचा किंवा परदेशात रोजगार शोधण्याचा विचार येतो, तेव्हा डोळ्यांसमोर फक्त संयुक्त अरब अमिरात (UAE), सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि बहरीन यांसारख्या आखाती (खाडी) देशांची नावे येतात. मात्र, आता जागतिक भूराजकीय समीकरणे आणि रोजगाराची बाजारपेठ वेगाने बदलत आहे. भारताचा पारंपरिक आणि अत्यंत विश्वासू मित्र असलेला रशिया आता भारतीय कामगारांसाठी ‘दुसरा आखाती देश’ म्हणून उदयास येत आहे. सध्याच्या घडीला रशियामध्ये काम करणाऱ्या भारतीय मजुरांची आणि कुशल कामगारांची संख्या तब्बल ७०,००० च्या पार गेली असून ही संख्या दिवसेंदिवस रॉकेटच्या वेगाने वाढत आहे.
या मोठ्या बदलामागे रशियासमोरील काही अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेले प्रदीर्घ युद्ध आणि देशातील सातत्याने घटत जाणारी लोकसंख्या यांमुळे रशियामध्ये सध्या शारीरिक श्रम करणारे मजूर तसेच विविध क्षेत्रांतील कुशल तंत्रज्ञांची (Skilled Labour) प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी रशिया आपल्या शेजारील माजी सोव्हिएत युनियनच्या देशांमधून कामगार मागवत असे. परंतु, नुकत्याच झालेल्या काही संशयास्पद दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव रशियाने आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. रशियाने आता आपला सर्वात जुना आणि खात्रीशीर मित्र असलेल्या भारतासाठी रोजगाराचे दरवाजे पूर्णपणे खुले केले आहेत.
भारतातील रशियाचे कार्यवाहक राजदूत रोमन बाबुश्किन यांनी नुकत्याच झालेल्या एका कामगार परिषदेत या वाढत्या सहकार्यावर शिक्कामोर्तब केले आहे. रशियन वृत्तसंस्था ‘TASS’ च्या अहवालानुसार, रशियातील केवळ एकाच क्षेत्रात नव्हे, तर कृषी (Agriculture), बांधकाम (Construction), गृहनिर्माण, खाणकाम, तेल आणि वायू (Oil & Gas), रेल्वे वाहतूक, जहाजबांधणी, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण (Pharmaceuticals), आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सेवा क्षेत्रांमध्ये भारतीय मनुष्यबळाला प्रचंड मागणी आहे. रशियाच्या बर्फाच्छादित रस्त्यांची स्वच्छता करण्यापासून ते मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी भारतीय तरुण आपली चमक दाखवत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल
या स्थलांतराला अधिकृत आणि सुरक्षित बनवण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी अत्यंत ठोस पावले उचलली आहेत. कार्यवाहक राजदूत रोमन बाबुश्किन यांनी माहिती दिली की, डिसेंबर २०२५ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या आंतर-सरकारी करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारांचा मुख्य हेतू अवैध स्थलांतराला आळा घालणे आणि दोन्ही देशांतील नागरिकांना कायदेशीररीत्या अल्प-मुदतीचा रोजगार (Short-term Employment) उपलब्ध करून देणे हा आहे. या अधिकृत करारामुळे आता रशियात जाणारे भारतीय कामगार पूर्णपणे सुरक्षित राहतील.
रशियन सरकारची योजना २०२६ च्या अखेरीस किमान ४०,००० नवीन भारतीय कामगारांना रशियात आणून त्यांना विविध उद्योगांमध्ये सामावून घेण्याची आहे. रशियामधून मोठ्या संख्येने स्थानिक लोक युरोप किंवा इतर देशांत स्थलांतरित झाल्यामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भारतीयांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. भारत आणि रशियामधील हा संवाद आता केवळ राजकीय स्तरावर मर्यादित नसून तो दोन्ही देशांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-India Trade: भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा! मोठ्या करारापूर्वी ट्रम्प यांची मोठी खेळी; ‘या’ 4 भारतीय कंपन्यांना ग्रीन सिग्नल
सर्वसामान्यांना आकर्षित करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रशियात मिळणारा भरघोस पगार आणि इतर सवलती. सध्या अधिकृत आणि काही सरकारमान्य एजन्सींच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. रशियामध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार दरमहा ५५६ डॉलर्स ते १,११२ डॉलर्स इतके वेतन दिले जात आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे तर, सेंट पीटर्सबर्गसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्ते स्वच्छता आणि देखभालीचे काम करणाऱ्या सर्वसामान्य कामगारालाही दरमहा जवळपास १,००,००० रुबल (भारतीय चलनात सुमारे ८५,००० ते ९५,००० रुपये) मिळत आहेत.
विशेष म्हणजे, या पगाराव्यतिरिक्त कामगारांना रशियन कंपन्यांकडून मोफत राहण्याची उत्तम सोय (Accommodation) आणि जेवण पुरवले जात आहे. तसेच, भाषा अडसर ठरू नये म्हणून या कामगारांना तिथल्या तिथे रशियन भाषा शिकवण्याचे विशेष वर्गही विनामूल्य चालवले जात आहेत. यापूर्वी काही फसव्या आणि अनधिकृत एजंट्सनी भारतीय तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून थेट युक्रेनच्या युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. मात्र, भारत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून त्या तरुणांची सुटका केली होती. आता या नवीन करारामुळे अशा फसवणुकीला पूर्णपणे चाप बसला असून, भारतीय तरुण अत्यंत सुरक्षित वातावरणात रशियात सन्मानाने लाखो रुपये कमवत आहेत.