युद्धबंदीचे श्रेय घेण्यात अमेरिका पुढे पण पाकिस्तानच्या 'दहशतवादी संबंधांवर' मात्र का बोलती बंद? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Pakistan ceasefire : भारत आणि पाकिस्तानदरम्यान अलीकडेच झालेल्या चार दिवसांच्या तणावानंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली, तरी त्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका युद्धबंदीचे संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेताना दिसते. परंतु, पाकिस्तानमधील दहशतवादी गटांना मिळणाऱ्या पाठिंब्यावर मात्र अमेरिकेने ठाम भूमिका घेण्याचे टाळले आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवर तिच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान स्पष्टपणे सांगितले की त्यांनी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांवर व्यापाराची धमकी देऊन युद्धबंदी स्वीकारण्यास भाग पाडले. यावर भारताने मात्र त्वरित प्रतिक्रिया देत ट्रम्पच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. भारताचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यापारदबावाशिवाय भारताने आपल्या धोरणानुसार निर्णय घेतला आणि पाकिस्तानविरोधातील कारवाया केवळ दहशतवाद विरोधात होत्या.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे स्वागत केले. त्यांनी दोन्ही शेजारी देशांमध्ये थेट संवादाचे महत्त्व अधोरेखित केले, पण जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पाकिस्तानने दहशतवादी गटांना समर्थन देणे थांबवण्याचे कुठलेही आश्वासन दिले आहे का, तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले.
पिगॉट म्हणाले, “आम्हाला दोन्ही बाजूंमध्ये थेट संवादाला प्रोत्साहन द्यायचं आहे. भारत आणि पाकिस्तानने शांतता निवडल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.” मात्र, यामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्याबाबत अमेरिका मौन बाळगते आहे, जे या संघर्षात खरी मुळं आहेत.
हे देखील वाचा : Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्तेचा महामेरू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज
भारताने स्पष्टपणे ट्रम्पच्या मध्यस्थीच्या दाव्यांना फेटाळून लावत, स्वतंत्र धोरणाअंतर्गत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई केली. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत ९ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला आणि सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई केवळ आत्मसंरक्षणाच्या अधिकारात केली गेली असून, भारताच्या मते पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मिळणारा संरक्षण आणि प्रशिक्षणाचा आधारच या संघर्षाचे खरे मूळ कारण आहे.
#WATCH | “… I can only reiterate that we welcome the ceasefire reached between India and Pakistan this weekend. We commend both Prime Ministers for choosing the path of peace… We also want to encourage direct communication between the parties…,” says Tommy Pigott, Principal… pic.twitter.com/kIIjNAOlIt
— ANI (@ANI) May 13, 2025
credit : social media
ट्रम्प यांनी युद्धबंदीचे श्रेय घेतले असले तरी, शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या दाव्यांवर भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अमेरिकेच्या शांतता प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, कारण तिच्या सहयोगी राष्ट्र पाकिस्तानकडून चालणाऱ्या दहशतवादाकडे अमेरिका डोळेझाक करते आहे. शांततेचा खरा मार्ग हा केवळ राजनैतिक संवाद नव्हे, तर दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्यामध्ये आहे, हे भारताने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Survey on Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू चीन की पाकिस्तान? पाहा जनमताचा कौल
भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणे हे संपूर्ण आशिया खंडासाठी सकारात्मक बाब आहे. परंतु, जर शांततेच्या नावाखाली दहशतवादाला थारा दिला जात असेल, तर ती शांतता फसवी ठरू शकते. अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमिकेबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा युद्धबंदी ही केवळ तात्पुरती संधी ठरेल. भारत दहशतवादाच्या विरोधात ठाम उभा आहे आणि या लढ्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रामाणिक पाठिंबा ही काळाची गरज आहे.