भारतात आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवतो आणि आपल्या गाड्यांमध्ये स्टिअरिंग व्हील उजव्या बाजूला असते, ज्याला ‘राईट हँड ड्राईव्ह’ (RHD) म्हणतात. याउलट अमेरिका किंवा युरोपमध्ये लोक रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवतात आणि तिथे ‘लेफ्ट हँड ड्राईव्ह’ (LHD) गाड्या असतात. भारतात डाव्या बाजूने चालण्याचा आणि उजव्या बाजूला स्टिअरिंग असण्याचा नियम का आहे? यामागे कोणताही वैज्ञानिक नियम नसून शतकानुशतके जुना इतिहास दडलेला आहे.
तलवारबाजी आणि घोडस्वारीचा इतिहास
या नियमाची पाळेमुळे थेट मध्ययुगीन काळातील घोडस्वारांशी जोडलेली आहेत. त्या काळात बहुतेक योद्धे हे उजव्या हाताने काम करणारे असायचे. जेव्हा ते घोड्यावरून प्रवास करायचे, तेव्हा रस्त्यावरून येणाऱ्या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी त्यांचा उजवा हात नेहमी तलवारीवर असायचा. डाव्या बाजूने प्रवास केल्यामुळे समोरून येणारा शत्रू त्यांच्या उजव्या हाताच्या म्हणजेच तलवारीच्या कक्षेत यायचा. त्यामुळे संरक्षणासाठी डाव्या बाजूने चालणे सुरक्षित मानले जाऊ लागले.
कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?
ब्रिटीश राजवट आणि भारताचा नियम
१७०० आणि १८०० च्या शतकात जेव्हा ब्रिटनने जगभर आपले साम्राज्य विस्तारले, तेव्हा त्यांनी आपल्या वसाहतींमध्ये हाच डाव्या बाजूने चालण्याचा नियम लागू केला. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये ब्रिटीश राजवटीमुळे डाव्या बाजूने वाहतूक सुरू झाली.
जेव्हा आधुनिक मोटार गाड्या बाजारात आल्या, तेव्हा चालकाला रस्त्याच्या मधोमध समोरून येणाऱ्या गाड्या स्पष्ट दिसाव्यात आणि ओव्हरटेक करणे सोपे जावे, म्हणून डाव्या बाजूच्या वाहतुकीसाठी गाड्यांच्या उजव्या बाजूला स्टिअरिंग व्हील बसवण्यात आले.
भारताचा कायदा काय सांगतो?
स्वातंत्र्यानंतर भारताने केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार (CMVR) ‘राईट हँड ड्राईव्ह’ हीच भारताची अधिकृत प्रणाली म्हणून स्वीकारली. भारतात लेफ्ट हँड ड्राईव्ह गाड्यांना सामान्य वापरासाठी नोंदणी मिळत नाही. जर परदेशातून अशी गाडी आयात केली, तर ठराविक मुदतीत तिचे स्टिअरिंग उजव्या बाजूला बदलून घ्यावे लागते, कारण भारतातील रस्ते, सिग्नल आणि ओव्हरटेकिंगचे नियम हे केवळ उजव्या बाजूच्या स्टिअरिंगसाठीच डिझाइन केलेले आहेत.
थोडक्यात सांगायचे तर, ब्रिटिशांनी भारतात सोडलेली ही ऐतिहासिक पद्धत आज आपल्या रस्ते सुरक्षेचा एक सर्वात महत्त्वाचा पाया बनली आहे!






