८० च्या दशकात भारतात जेव्हा गाड्यांचा उल्लेख व्हायचा, तेव्हा डोळ्यांसमोर फक्त ॲम्बेसेडर किंवा प्रीमियर पद्मिनी यायच्या. अशा काळात बंगळुरूच्या ‘सिपानी ऑटोमोबाईल्स’ कंपनीने भारतीय रस्त्यांवर एक अशी कार उतरवली, जी आपल्या काळापेक्षा खूप पुढे होती. या कारचे नाव होते ‘सिपानी डॉल्फिन’.
१९८२ मध्ये लाँच झालेली ही कार लोखंडाची नसून, तिची संपूर्ण बॉडी ‘फायबरग्लास’ पासून बनवली गेली होती. ब्रिटनच्या ‘रिलायंट किटन’ या मॉडेलवर आधारित असलेल्या या गाड्यांचे वजन अवघे ५०५ किलो होते. वजनाने हलकी आणि ८४८ सीसी च्या शक्तिशाली इंजिनमुळे या २-डोअर कारचा ‘पॉवर-टू-वेट रेशो’ अप्रतिम होता. यामुळे ही कार रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने धावायची. विशेषतः भारतीय रॅली आणि रेसिंग जगतात या कारने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आणि कार प्रेमींना वेड लावले.
भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा
परंतु, ही वेगवान ‘डॉल्फिन’ बाजारात मात्र फार काळ टिकू शकली नाही. यामागे सर्वात मोठे कारण होते सुरक्षा आणि भारतीय ग्राहकांची मानसिकता. भारतातील लोकांना फायबरच्या बॉडीवर विश्वास नव्हता; अपघातात ही गाडी पत्त्यांसारखी विखुरेल अशी भीती ग्राहकांना होती. तसेच कौटुंबिक वापरासाठी दोन दरवाजे असलेल्या कारऐवजी चार दरवाजे असणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले जात असे.
याच काळात, म्हणजेच १९८३ मध्ये, संजय गांधी यांच्या स्वप्नातील ‘मारुती ८००’ कारने भारतीय बाजारात प्रवेश केला. मारुतीच्या ४-डोअर मजबूत लोखंडी डिझाईन आणि स्वस्त सुट्या भागांमुळे मध्यमवर्गीयांनी सिपानीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. कंपनीने नंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘मॉन्टाना’ नावाने ४-डोअर मॉडेल आणले, पण तोपर्यंत मारुतीने बाजारपेठेवर पूर्ण ताबा मिळवला होता. शेवटी, अत्यंत कमी विक्रीमुळे १९८७ मध्ये या वेगवान ‘प्लास्टिक कार’चे उत्पादन कायमचे बंद झाले आणि भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक धाडसी प्रयोग काळाच्या पडद्याआड गेला.






