Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (ता.२३) सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी क्षेत्राला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या कृषी क्षेत्राला सर्वसमावेशक सुधारणांची गरज असल्याचे आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात म्हटले आहे. या सर्वेक्षणात देशाच्या एकूण आर्थिक वाढीला अडथळा ठरणाऱ्या संरचनात्मक समस्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून संकेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२२) संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये कृषी क्षेत्रासमोरील अनेक प्रमुख आव्हाने समोर आली आहेत. ज्यात ज्यामध्ये अन्नधान्य महागाईचे व्यवस्थापन करताना कृषी क्षेत्राची वाढ कायम ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय किंमत शोध यंत्रणा सुधारणे आणि जमिनीच्या तुकडीकरण समस्येचे निराकरण करणे समाविष्ट आहे. यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक सवलती मिळू शकतात, असे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अर्थमंत्री अनेक मोठ्या घोषणा करू शकतात.
आर्थिक वाढीवर परिणाम
भारतीय कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे कृषी क्षेत्राच्या आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, धोरणकर्त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अन्नधान्याच्या किमती स्वीकार्य मर्यादेत ठेवणे यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, कृषी क्षेत्रात पीक वैविध्य वाढवणे आणि क्षेत्रातील एकूण कार्यक्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.
काय सांगितलेत उपाय?
याशिवाय प्रमुख सूचनांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन, शेतीच्या पद्धतींमध्ये आधुनिक कौशल्यांचा वापर, कृषी विपणन संधी वाढवणे, किमती स्थिर करणे, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण अवलंब करणे. खते, पाणी आणि इतर निविष्ठांचा अपव्यय कमी करणे आणि कृषी-उद्योग संबंध सुधारणे यांचा देखील आज अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.