Train Alcohol Rules
जर तुमचा हा प्रश्न आहे की, “तुम्ही ट्रेनमध्ये दारूची बाटली घेऊन जाऊ शकता का?”, तेव्हा याचे सोपे उत्तर नाही असंच आहे. जर तुम्ही असं कृत्य केलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.. भारतीय रेल्वे कायदा १९८९ नुसार, कोणताही प्रवासी असा कोणताही पदार्थ सोबत बाळगू किंवा सेवन करू शकत नाही, ज्यामुळे इतरांना गैरसोय होऊ शकते. पण जेव्हा दारूचा विषय येतो, तेव्हा अधिकारी स्पष्ट सांगतात की सीलबंद बाटल्यांमध्ये दारू नेण्यावर कोणतेही बंधन नाही. पण काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या राज्यात प्रवास करत आहात, तिथे दारूवर बंदी आहे की नाही हे तपासा. याचा अर्थ असा की, ट्रेनमध्ये दारू नेल्यास केवळ रेल्वेचे नियमच नव्हे, तर संबंधित राज्याचे उत्पादन शुल्क नियम देखील लागू होतात. त्यामुळे त्यांचीही माहिती असणं फार गरजेचं आहे.
समजा, मोहन मनोहर हा नवी दिल्लीहून वाराणसीला ट्रेनने प्रवास करत आहे. तो वैयक्तिक वापरासाठी एका सीलबंद बाटलीत दारू घेऊन जात आहे. उत्तर प्रदेशचे उत्पादन शुल्क नियम याला परवानगी देतात. पण जर तीच व्यक्ती बिहारला प्रवास करत असेल, तर तो दारूची बाटली घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, तो गुजरातमध्येही दारूची बाटली घेऊन जाऊ शकत नाही, कारण या राज्यांमध्ये दारूवर बंदी आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये दारूच्या बाटल्यांच्या संख्येवर कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही. पण अनेक राज्यांचे उत्पादन शुल्क नियम एक विशिष्ट संख्या नमूद करतात. काही राज्यांनी ही संख्या दोनपर्यंत मर्यादित केली आहे. दिल्ली मेट्रोमध्येही फक्त दोनच बाटल्या दारू नेण्याची परवानगी आहे. याचा अर्थ, तुम्ही सीलबंद बाटलीत दारूच्या दोन बाटल्या सहजपणे घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही यापेक्षा जास्त बाटल्या नेल्या, तर तुम्ही ज्या राज्यात प्रवास करत आहात तेथील उत्पादन शुल्क नियमांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये दारू पिण्यास मनाई आहे, कारण मद्यधुंद प्रवासी इतर प्रवाशांशी गैरवर्तन करू शकतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर रेल्वेच्या नियमांनुसार कारवाई केली जाते. रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ नुसार, असे करणाऱ्यांना ५०० रुपये दंड, सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.






