(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काही दिवसांपूर्वी, FSSAI ने डाबरला त्यांच्या पॅकेजिंगवर १००% शुद्ध, १००% नैसर्गिक, किंवा “१००% सेंद्रिय असे दावे असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. FSSAI ने म्हटले आहे की, असे दावे अप्रमाणित असून ते ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे असे दावे करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती.
FSSAI ने कारणे दाखवा नोटीस न बजावता किंवा कंपनीची बाजू ऐकून न घेता इतका व्यापक आणि मोठाआदेश जारी केला, असा आरोप करत डाबरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कंपनीचा दावा आहे की, ती अनेक वर्षांपासून या लेबल्सखाली आपली उत्पादने विकत आहे आणि अचानक विक्री थांबवणे हे योग्य प्रक्रियेचे पालन करत नाही. त्यामुळे हे कारणं समोर ठेवत कंपनीने आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.
सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने FSSAI च्या आदेशावर तात्पुरती अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने म्हटले की, जोपर्यंत प्रकरणाची पूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत कंपनीला दिलासा देण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, डाबर सध्या १००% दाव्यांसह आपली उत्पादने विकणे सुरू ठेवेल. पण हा अंतिम निर्णय नाही आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
या प्रकरणात डाबरच्या अनेक खाद्य उत्पादनांचा समावेश आहे, ज्यात मध, तूप, खोबरेल तेल आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश आहे, ज्यांत डाबरने त्यांच्या पॅकेजिंगवर १००% शुद्धतेचा दावा केला आहे.
FSSAI चे म्हणणे आहे की, “१००%” सारखे दावे कायद्यानुसार दिशाभूल करणारे मानले जाऊ शकतात, कारण ते पूर्णपणे सिद्ध करणे कठीण असते. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील अशा दाव्यांमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते, म्हणूनच नियामकाने त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी त्यांना हा निर्णय घेतला.
सध्या तरी, ग्राहकांसाठी कोणतेही मोठे बदल नाहीत. १००% सारखे दावे असलेली डाबरची उत्पादने बाजारात उपलब्ध राहतील. पण या प्रकरणातील अंतिम निकालानंतर, कंपन्यांना त्यांच्या लेबल्स आणि जाहिरातींमध्ये बदल करावे लागू शकतात. जर न्यायालयाने FSSAI च्या बाजूने निकाल दिला, तर त्याचा परिणाम इतर कंपन्यांवरही होऊ शकतो.






