(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मोतीलाल ओसवाल फाउंडेशनने पालघर जिल्हा परिषदेसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत ‘पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तन कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे.हा सामंजस्य करार म्हणजे जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या, शासनाच्या नेतृत्वाखालील उपक्रमाची सुरुवात आहे. ‘क्रेडल टू करिअर’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे. बालपणापासून ते युवकांच्या रोजगारक्षमतेपर्यंत पालघरमधील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, निपुण भारत आणि निपुण महाराष्ट्र यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
1 जुलैपासून काय बदलणार? लागून होणार नवे नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
पुढील तीन वर्षांत या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीमधील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ९८ हजारांहून अधिक अंगणवाडीतील बालके आणि २ हजार युवकांचाही या कार्यक्रमात समावेश असेल. पालघर जिल्ह्यातील २,११५ शासकीय शाळा, २२ खासगी अनुदानित शाळा आणि १,६३४ अंगणवाडी केंद्रांमधून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमात चार प्रमुख विषयांवर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये १) बालपणीचे शिक्षण, २) मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान, ३) भविष्यातील शिक्षण कौशल्ये आणि ४) युवकांचे कौशल्य विकास व रोजगारक्षमता यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच शासनाची मालकी आणि सहभाग राहणार आहे. कार्यक्रमातील यशस्वी पद्धती, प्रशिक्षण मॉड्यूल्स आणि कार्यपद्धती जिल्हा परिषद, पालघरच्या यंत्रणेमध्ये संस्थात्मक स्वरूपात समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतरही त्याची सातत्याने अंमलबजावणी करता येईल. त्याचा विस्तारही करता येईल. अधिक प्रभावी परिणाम साधण्यासाठी विद्यमान शासकीय योजना आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करण्यात येईल.
शिक्षकांची कमतरता, देखरेखीतील सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करणे अशा आव्हानांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सर्व संबंधित घटकांना एकत्र आणणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला या उपक्रमातून बळ मिळणार आहे.
मोतीलाल ओसवाल फाउंडेशन या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम करेल. संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. प्रभावी उपक्रमांचा सार्वजनिक धोरणांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाला मदत केली जाईल. पालघर जिल्हा परिषद कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि विविध विभागांमधील समन्वयाची जबाबदारी सांभाळेल. दीर्घकालीन परिणाम साधण्यावर भर दिला जाईल.
या भागीदारीबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. सुनीता अग्रवाल म्हणाल्या, “आमच्या फाउंडेशनचे वाडा परिसरातील शाळांसोबत गेल्या दशकापासून सातत्यपूर्ण काम सुरू आहे. आता हा उपक्रम संपूर्ण पालघर जिल्ह्यात विस्तारण्याचा आमचा मानस आहे. शाश्वत शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाय विकसित करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे हे सहकार्य प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळांसाठी अधिक चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. त्यांना अधिक सक्षम सहाय्य व्यवस्था उपलब्ध होईल.”
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे (आयएएस) म्हणाले, “पालघरमधील प्रत्येक बालक आणि युवकाचे शैक्षणिक परिणाम अधिक चांगले करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे सहकार्य प्रतीक आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांच्या सामर्थ्याला या उपक्रमातून एकत्र आणले आहे. त्यामुळे बालपणापासून रोजगारक्षमतेपर्यंतच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील विविध आव्हानांवर समन्वित पद्धतीने काम करता येईल. जिल्हाभर मोजता येण्याजोगा आणि दीर्घकालीन परिणाम करणारे मॉडेल उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO! दररोज कमवतो तब्बल 21 कोटी रुपये






