फोटो सौजन्य - Social Media
नीता परब :राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा गुरुवारी राज्यभर शांततेत आणि सुरळीत पार पडली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत झालेल्या या परीक्षेत एकूण ८१.९४ टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही सत्रांत मिळून ४१,८३४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३४,२७८ विद्यार्थी उपस्थित होते. यंदा तीन वर्षीय एलएलबी सीईटीसाठी एकूण ८३,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यभरातून कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याने परीक्षा प्रक्रिया निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १५६ केंद्रांवर ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्यात आली. तीन वर्षीय एलएलबी सीईटी १ आणि २ एप्रिल २०२६ या दोन दिवसांत आयोजित करण्यात आली होती.
सकाळच्या सत्रात ८१.७५% उपस्थिती
सकाळच्या सत्रात २०,९३३ विद्यार्थ्यांपैकी १७,११३ विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रात ८१.७५ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर ३,८२० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडली.
दुपारच्या सत्रात ८२.१३% उपस्थिती
दुपारच्या सत्रात २०,९०१ विद्यार्थ्यांपैकी १७,१६५ विद्यार्थी परीक्षेला बसले. या सत्रात ८२.१३ टक्के उपस्थिती नोंदली गेली, तर ३,७३६ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. हे सत्र दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झाले.
एकूणच, यंदाची एलएलबी सीईटी परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरीत्या पार पडली असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही समाधानकारक राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
LLB CET दिल्याने काय होतं?
एलएलबी सीईटी परीक्षा देण्याचे अनेक फायदे आहेत. या परीक्षेद्वारे राज्यातील नामांकित कायदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. कायद्याचे शिक्षण घेतल्याने वकिली, न्यायव्यवस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्येही करिअरच्या विविध वाटा खुल्या होतात. याशिवाय, एलएलबी केल्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि समाजातील प्रश्न समजून घेण्याची दृष्टी विकसित होते, जे भविष्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही उपयोगी ठरते.






