
admission
FYJC 11th Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ३३,३८५ हजार विद्यार्थ्यांनी या शाखेची निवड केली तर विद्यार्थ्यांनी वाणिज्य (कॉमर्स) शाखेची निवड केली. यावरून प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे वाढता कल दिसून येत आहे.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्यांतील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून या भागात ७६,२१४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या विभागात एकूण ४ लाख ७७ हजार २९० जागा उपलब्ध असून या रिक्त जागांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत.
या विभागातील विज्ञान शाखेतील एकूण १ लाख ६७ हजार जागांपैकी ३२ हजार ६८ जागा भरल्या आहेत तर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे ओढा कायम राहिला आहे.
वाणिज्य शाखेतील २ लाख ३४ हजार ४३० जागांपैकी ३२ हजार २१४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून यंदाही कला शाखेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. या शाखेतील ७५ हजार १२० जागांपैकी केवळ १० हजार ६१५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
पहिल्या फेरीनंतर दुसरी प्रवेश फेरी १३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान कमी गुण असूनही अनेक विद्यार्थी केवळ नामांकित महाविद्यालयांना पसंती देत असल्याने त्यांना प्रवेश मिळवण्यात अडचणी येत असल्याचे शिक्षण विभागातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या गुणांचा आणि उपलब्ध जागांचा विचार करून पसंतीक्रम भरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.