फोटो सौजन्य AI
Navi Mumbai News : महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत डिजिटल जन्म दाखला अनिवार्य ठरत असताना, 2016 पूर्वीच्या जन्मनोंदणीच्या डिजिटल दाखल्यांना विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. नवी मुंबई महापालिकेकडून 2016 नंतरचे जन्म दाखले डिजिटल स्वरूपात दिले जात असले, तरी त्यापूर्वीच्या नोंदींसाठीचे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. मात्र तेथे या अर्जांवर दीड महिन्यापर्यंत कार्यवाही होत नसल्याची तक्रार आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणांनंतर जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रीय पोर्टलवर करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शाळा प्रवेश, पासपोर्ट, वाहनचालक परवाना तसेच विविध शासकीय कामांसाठी जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून डिजिटल जन्म दाखल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेत 2016 पासून डिजिटल जन्म दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र 2016 पूर्वीच्या जन्मनोंदीचा डिजिटल दाखला मिळण्यासाठी अर्ज आल्यास तो पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जातो. संबंधित कार्यालयाकडून या अर्जांवर वेळेत कार्यवाही होत नसल्याने अनेक अर्ज प्रलंबित आहेत.
दरम्यान, मागील महिन्यापासून महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशावेळी डिजिटल जन्म दाखल्याची मागणी केली जात असल्याने दाखला मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरू आहे.
प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून डिजिटल जन्म दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समाजसेवक विजय देशमुख यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रवेश प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यानेही 2016 नंतरचे जन्म दाखले डिजिटल स्वरूपात दिले जात असल्याची माहिती दिली.
Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
2016 पूर्वीच्या जन्म दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोट“महाविद्यालय प्रवेशासाठी डिजिटल जन्म दाखला आवश्यक असताना तो मिळण्यास दीड महिन्याचा विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित कार्यालयाने प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून दाखले वितरित करावेत.”



