PRIF: शिक्षणापासून नोकरीपर्यंतची नवी वाट ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
२०१९ मध्ये सुरू झालेल्या ‘PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमाचा’ आतापर्यंत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. या कार्यक्रमातून २,५७६ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळाली आहे. ही मदत केवळ फी भरण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी तयार करण्यावरही भर दिला जात आहे. PRIF:
या योजनेतून थेट शिष्यवृत्तीच्या स्वरूपात ६.९१ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर सरकारी आणि खासगी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देत आणखी ४.७७ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. म्हणजेच एकूण ११.६८ कोटी रुपयांची मदत शिक्षणासाठी उपलब्ध झाली आहे.
पण या उपक्रमाची खरी खासियत आर्थिक मदतीपलीकडे आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे काय करायचं, कोणतं कौशल्य शिकायचं आणि नोकरीसाठी स्वतःला कसं तयार करायचं, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जातं. करिअरविषयक सल्ला, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवण्याऐवजी स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची दिशा मिळत आहे.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचा विचार करून फाउंडेशनने डिजिटल लर्निंग अँड रिसोर्स सेंटर्सही सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, विविध कौशल्यांचं प्रशिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक तयारी करता येते. आतापर्यंत या केंद्रांमध्ये २५० हून अधिक तासांचे प्रशिक्षण, १०५ सत्रे आणि १८ हजारांपेक्षा जास्त भेटी झाल्या आहेत. त्यामुळे ही केंद्रं स्थानिक तरुणांसाठी शिकण्याची आणि पुढे जाण्याची महत्त्वाची जागा ठरत आहेत.
या कामामागची भूमिका सांगताना फाउंडेशनकडून तरुणांच्या स्वप्नांकडे समान नजरेने पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली. घरची परिस्थिती, शहर किंवा गाव, आर्थिक स्थिती यामध्ये फरक असला तरी चांगलं आयुष्य घडवण्याची इच्छा प्रत्येक तरुणाच्या मनात असते. त्यामुळे योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळालं, तर अनेक तरुण आपली परिस्थिती बदलू शकतात, असा या उपक्रमाचा मुख्य विचार आहे.
या प्रयत्नांचा परिणाम रोजगाराच्या आकडेवारीतही दिसतो. कार्यक्रमातून मार्गदर्शन घेतलेल्या ३६४ विद्यार्थ्यांना आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील २७३ कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. या तरुणांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न सुमारे १० कोटी रुपये आहे. एका स्वतंत्र सामाजिक परिणामाच्या अभ्यासानुसार, कार्यक्रमात खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे सुमारे तीन रुपयांचा सामाजिक फायदा निर्माण झाला आहे.
या योजनेत मुलींच्या शिक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. लाभार्थ्यांमध्ये सुमारे ७० टक्के मुली आहेत. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. घरात पहिल्यांदाच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, एकल पालकांची मुलं आणि अनाथ विद्यार्थ्यांनाही प्राधान्य मिळालं आहे.
IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
या उपक्रमातून मदत घेतलेले विद्यार्थी आता स्वतः इतरांसाठी पुढे येत आहेत, हीदेखील विशेष बाब आहे. नाशिकमधील माजी विद्यार्थ्यांनी मिळून तीन लाख रुपयांचा सामुदायिक निधी तयार केला आहे. भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.
Career Guide: फुल-टाइम जॉब की फ्रीलांसिंग निवडावे? कोणता पर्याय तुमच्या भविष्यासाठी ठरेल सर्वोत्तम!
एका विद्यार्थ्याला दिलेली छोटीशी संधी कधी संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते. शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांना एकत्र जोडण्याचा हा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. मदत घेणाऱ्याला उद्या मदत करणारा बनवणं, हीच या उपक्रमाची खरी ताकद म्हणावी लागेल.

