
धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण...
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली. शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात कौटुंबिक संशयातून एका विवाहित महिलेचा गळा दाबून हत्या केली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पत्नीने पतीला चावा घेतल्याची बाबही समोर आली असून, अखेरीस संतापाच्या भरात पतीने तिचा गळा दाबून हत्या केली.
भाग्यलक्ष्मी ऊर्फ बन्नू राजेश मुक्या (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव असून, राजेश गोपाल मुक्या (वय २४) असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड कर्तव्यावर असताना यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथून एका महिलेच्या मृत्यूबाबत माहिती प्राप्त झाली. तत्काळ पोलिसांनी रुग्णालयात भेट देत भाग्यलक्ष्मी ऊर्फ बन्नू राजेश मुक्या हिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची खात्री केली. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद वाटल्याने मर्ग नोंदवून पंचनामा व पुढील तपास सुरू करण्यात आला.
बुधवारच्या रात्री आरोपी कामावरून घरी आल्यानंतर पत्नीने त्याच्यावर परस्त्री संबंधांचा संशय घेत वाद घातला. या वादाचे रूपांतर तीव्र झटापटीत झाले. संतापाच्या भरात आरोपीने पत्नीला मारहाण करत उजव्या हाताने तिचा गळा पकडून पलंगावर दाबून ठेवले. काही मिनिटांतच तिची हालचाल बंद झाली. यानंतर आरोपीने ती झोपली आहे, असे समजून दुर्लक्ष केले. मात्र, बुधवारी पहाटे सुमारे ३ वाजता उठविण्याचा प्रयत्न केला असता ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर मित्रांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पत्नीने भांडणादरम्यान चावा घेतल्याचे उघड
घटनास्थळी पाहणीदरम्यान मृत महिलेचा पती राजेश गोपाल मुक्या याच्या हातावर व शरीरावर जखमा आढळल्या. याबाबत चौकशी केली असता, पत्नीशी झालेल्या भांडणादरम्यान तिने त्याच्या हातावर व अंगावर चावा घेतल्याचे त्याने कबूल केले. शवविच्छेदनाच्या अंतरिम अहवालानुसार, गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून, आरोपी राजेश गोपाल भुक्या याला अटक केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे करीत आहे.
प्रेमसंबधातून झाले होते लग्न
मृतक भाग्यलक्ष्मी ही मंचेरीयाल, तेलंगणा येथील असून तिचे अगोदर लग्न झाले होते. तिला ११ व ८ वर्षाचे दोन मुले आहेत. नंतर तिचे प्रेमसंबंध १० वर्षांनी लहान असणारा आरोपी राजेश सोबत झाले होते. ते मंचेरीयाल येथून पळून येऊन बल्लारपूर येथे पती पत्नी म्हणून राहत होते. ही घटना संशयातून घडली असावी असा संशय वर्तविण्यात आला आहे.