
आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन, धक्कादायक कारणही समोर; चिठ्ठीत कंपनीतील महिलांचे नाव
पिंपरी : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, हिंजवडीतील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अभय ब्रह्मे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विनोद जेठालाल पालीचा तसेच टीसीएस, हिंजवडी येथील अर्चना आणि शाश्वती या कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचा मुलगा अनिश अमित ब्रह्मे (वय १९, रा. भोसरी) याने मंगळवारी (दि. ९) याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ब्रह्मे हे हिंजवडी येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीत कार्यरत होते. त्यांनी २ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही व्यक्तींमुळे होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, संशयित विनोद पालीचा याच्या पत्नीची आणि फिर्यादीच्या आईची फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय निर्माण झाला. दरम्यान, कौटुंबिक वादातून पालीचा यांची पत्नी परदेशात गेल्यानंतर त्याचा राग मनात धरून पालीचा यांनी अमित ब्रह्मे यांच्या विरोधात चोरी व फसवणुकीच्या खोट्या तक्रारी केल्या. तसेच वकिलामार्फत नोटिसा पाठविणे, कंपनीच्या अधिकृत ई-मेलवर बदनामीकारक संदेश पाठविणे अशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, टीसीएसच्या डीईजी प्रकल्पात कार्यरत असलेल्या अर्चना आणि शाश्वती या महिला कर्मचाऱ्यांकडूनही अमित ब्रह्मे यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यांच्या हातातील महत्त्वाचे प्रकल्प काढून घेणे, अपरिचित कामे सोपविणे, सर्वांसमोर अपमान करणे, नोकरी सोडण्याचा सल्ला देणे तसेच कामाबाबत नकारात्मक अभिप्राय देण्याची धमकी देणे, अशा प्रकारे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता.
पत्नी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अमित ब्रह्मे आधीच तणावाखाली होते. त्यातच सातत्याने होणारा मानसिक छळ, बदनामी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक यामुळे ते नैराश्यात गेले होते. अखेर या सर्व प्रकारांना कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा : 400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ
संशयित महिलांकडून होत असलेला कथित छळ आणि विनोद पालीचा याच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळेच आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे अमित ब्रह्मे यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक केतन मांजरे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार