
कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले
चरणदास लक्ष्मण आकटे (वय ६४, रा. रत्नागिरी) तसेच आश्यप्पा गुरू सिद्धप्पा मस्तीहोली (वय ३५, रा. कर्नाटक) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चरणदास हे त्यांच्या कारने मुंबईकडे जात होते. तर, मस्तीहोली हा त्याच्याकडील सिमेंटचा बंकर घेऊन निघाला होता. त्याचे कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरवरील नियत्रंण सुटल्यानंतर त्याने प्रथम एका कारला जोराची धडक दिली. त्यानंतर तो तिथे न थांबता तो पुढे जाऊन एका हॉटेलसमोर त्याने दुसऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर कंटेनर एका ठिकाणी रोडच्या कडेला उलटला गेला. त्यामुळे पुढील मोठा धोका टळला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अचानक झालेल्या या अपघातामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अपघात पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडला होता. याची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस तसेच अग्निमशन दलाने याठिकाणी धाव घेतली. त्यांनी एकाला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुर्ववत केली. सुदैवाने जिवीतहानी झाली नसल्याचे समजते. अपघातात कारमधील व्यक्ती जखमी झाले आहेत.
भेदरलेला आवाज अन् सुटकेचा थरार
अपघातात एक कारचालक गाडीमध्ये अडकला गेला होता. गाडी चारही बाजूने दबली गेली होती आणि तो आतमध्ये अडकला गेला होता. तो आतून आवाज देता होता. त्याचवेळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या व्यक्तीला धीर देत त्याची सुटका करण्यास सुरूवात केली. कारचा पत्रा कापून संबंधित व्यक्तीला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. हा प्रसंग थरारक होता.
वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप, दूरवर रांगा
कंटेनरच्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले आहे. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कात्रज बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला. प्रामुख्याने महामार्गावरच कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.