संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज भागात घरफोडी, महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीनाने मौजमजेसाठी घरफोडी, दागिने चोरीचे तीन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून दुचाकी, दागिने असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ परिसरात पादचारी महिलेकडील दागिने चोरून नेण्यात आले होते. पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्याचा माग काढण्यात येत होता. गस्त घालणारे पाेलीस शिपाई मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना अल्पवयीनाने महिलेचे दागिने चोरुन नेल्याची मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पेरुची बाग परिसरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने भारती विद्यापीठ परिसरात घरफोडीचे दोन गुन्हे, तसेच दागिने चोरीचा एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगा साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि तपास पथाकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : इचलकरंजी हादरली! तरुणाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलून खून; नेमकं काय घडलं?
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
औंध भागात ४ लाखांची घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.