संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नदीपात्रातील रस्त्यावर पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला दत्तवाडीत राहायला आहेत. त्या शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास डेक्कन जिमखाना येथून नदीपात्राच्या रस्त्याने निघाल्या होत्या. रजपूत वीटभट्टीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले अधिक तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेल्याची घटना कात्रज भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे. तक्रारदार आणि त्यांची पत्नी आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांची पत्नी पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.