
'एएनटीएफ'चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या
राज्यभरात अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सचे मुंबई वगळता कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती तसेच नांदेड विभाग करण्यात आले आहेत. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मुख्यालय आहे. येथून या विभागाचे कामकाज सुरू असून, सीआयडीचे अतिरीक्त पोलिस महासंचालक तसेच प्रमुख सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे कामकाज सुरू आहे. अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या प्रत्येक विभागाला एक डीवायएसपी तसेच दोन डीवायएसपीसाठी (उपविभागीय पोलिस अधिकारी) एसपी (पोलिस अधीक्षक) आहेत. कर्मचाऱ्यांच्या नेमणूका काही विभागात सुरूच आहेत. तर, कार्यालयीन कामकाज देखील नुकतेच सुरूवात झालेले असताना या पथकांनी कामगिरी सुरू केली आहे.
नेटवर्क मोडीत काढण्यासाठी पथकाची सुरूवात
राज्यात अमली पदार्थांची वाढती साखळी, तरुणांमध्ये वाढते व्यसन व आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेले याचे नेटवर्क मोडीत काढण्यासाठी या पथकाची सुरूवात करण्यात आली आहे. वेगवेगळ्या शहरातील पोलिस अंमलदार यांची नेमणूक करून कारवाई केली जात आहे. गुप्त माहिती तसेच तांत्रिक तपासावरून ड्रग्ज तस्कर, त्यांचे एंजट व मोठे सूत्रधार पकडले जात आहेत. पथकाकडून फक्त एंजट नाही तर त्याची पाळेमुळे खोदण्याचे काम केले जात आहे.
हे सुद्धा वाचा : आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार
म्होरके केले जेरबंद
गेल्या काही महिन्यांपुर्वी सुरू झालेल्या पथकाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक तसेच औरंगाबाद विभागांमध्ये समन्वय वापरून मोठी कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची साठवणूक, वितरण साखळी व आर्थिक व्यवहार उघडकीस आणत काही म्होरके देखील जेरबंद केले आहेत. स्थानिक पोलिसांकडून होणारी कारवाई तसेच टास्क फोर्स अशा दोन वेगवेगळ्या पातळीवर ड्रग्ज तस्करांवर कारवाई सुरू झाल्याने अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.