सौजन्य फोटो - सोशल मि़डीया
आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी परिसरातून ७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याचे तसेच तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी हत्या आणि अत्याचाराच्या दिशेने तपास सुरू केला.
घटनेनंतर सुरुवातीचे सुमारे सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, २६ जुलै २०१८ रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी काळेलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पीडित मुली आणि त्यांच्या आईचे न्यायालयात कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले. या जबाबातून ७ जानेवारी रोजी मृत मुलीसोबत आरोपी असल्याची माहिती तपास यंत्रणेस मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दिशेने तपासाला वेग दिला आणि काळेलला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने मृतदेह लपवण्याचा आणि नंतर तो विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. लोखंडी कणगी आणि चादर यांसह अन्य वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. चादरीवर आढळलेली टिकली पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी ओळखली. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात लोखंडी कणगीत मानवी रक्ताचे अंश आढळल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्यांसह साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुरावे खटल्यात महत्त्वाचे ठरले.
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १९ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिवाजी काळेलला अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१८मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल काही वर्षांनी लागला असून, विटा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाकडे आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते.






