फोटो सौजन्य- iStock
वाडी : सध्या मोबाईलद्वारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नागरिक तक्रारींसाठीही ऑनलाईन सुविधा वापरतात. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून, अनेक नागरिक त्यांचे बळी ठरत आहेत. अशीच एक सायबर फसवणुकीची घटना वाडी परिसरात उघडकीस आली आहे.
हेदेखील वाचा : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अखेर बेड्या; छत्तीसगडच्या दुर्गमधून घेतलं ताब्यात
दत्तवाडी तभाने लेआऊट, समर्थ गजानन सोसायटी, वाडी येथील रहिवासी अविनाश मेश्राम हे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांच्या मोबाईलवरील फोन पे सेवा बंद पडल्याने गुगलवर त्यांनी हेल्पलाईन क्रमांक शोधला आणि त्यावर संपर्क साधला. त्या क्रमांकावर फोन करताच समोरील व्यक्तीने त्यांची समस्या ऐकून घेतली आणि काही आवश्यक प्रक्रिया सांगितली. त्यानुसार यूपीआय क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर तपशील पाठवण्यास सांगितले.
दरम्यान, मेश्राम यांनी आवश्यक माहिती पाठवल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांतच 1 लाख 20 हजार रुपये गायब झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. हे पाहताच ते हादरले. त्यांनी स्वतः कोणताही व्यवहार केला नव्हता किंवा ओटीपीही दिला नव्हता, तरीही मोठी रक्कम वजा झाली होती.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार
घटनेनंतर मेश्राम यांनी सामाजिक कार्यकर्ते अमित हुस्नापुरे यांना माहिती दिली. त्यांनी मेश्राम यांना सोबत घेऊन वाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर सायबर क्राईम कार्यालय, नागपूर येथे जाऊन अधिकृत गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी त्वरित संबंधित क्रमांक ब्लॉक करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले.
हेदेखील वाचा : Kolkata Doctor Case: अखेर न्याय मिळाला! आरजी कार अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय






