आज भारतात ‘वाघ बकरी’ हे चहाच्या क्षेत्रातील अत्यंत नामांकित नाव आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की या चहाच्या नावामागे आणि लोगोमागे एक मोठा इतिहास आणि सामाजिक संदेश दडला आहे? एका सामान्य चहाच्या ब्रँडने समाज सुधारणेसाठी आणि समानतेसाठी टाकलेले हे पाऊल अतिशय स्पेशल आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सुरुवात आणि गांधीजींची साथ
या ब्रँडची सुरुवात १८९२ मध्ये झाली. गुजरातचे रहिवासी नारणदास देसाई हे चहाच्या व्यवसायानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथे ते चहाच्या बागा सांभाळायचे. तिथेच त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष आणि भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत असताना नारणदास देसाई यांना तिथून भारतात परतावे लागले. १९१५ मध्ये ते जेव्हा भारतात आले, तेव्हा गांधीजींच्या प्रेरणेने त्यांनी अहमदाबादमध्ये चहाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आणि १९१९ मध्ये ‘वाघ बकरी चहा’चा जन्म झाला.
महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल
नावामागचा आणि लोगोमागचा क्रांतिकारी विचार
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात इंग्रजांचे राज्य होते, तसेच समाजात जातीभेद आणि उच्च-नीच भाव मोठ्या प्रमाणावर होता. नारणदास देसाई यांना चहाच्या माध्यमातून समाजात एकता निर्माण करायची होती.
त्यांनी त्यांच्या चहाचे नाव ‘वाघ बकरी’ ठेवले आणि पॅकेटवर एक खास लोगो तयार केला. या लोगोमध्ये एक वाघ आणि शेळी किंवा बकरी एकाच कपमधून एकत्र चहा पिताना दाखवले गेले. वाघ हा शक्तीचे किंवा उच्च वर्गाचे किंवा जुलमी इंग्रजांचे प्रतीक होता, तर बकरी ही सामान्य जनतेचे आणि शांततेचे प्रतीक होती. एकाच कपातून दोघांना चहा पिताना दाखवून त्यांनी हा संदेश दिला की, चहाच्या टपरीवर किंवा घरात चहा पिताना सर्व लोक समान आहेत; तिथे कोणताही भेदभाव चालणार नाही.
‘बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने’! भारतीय ट्रकवरच्या मजेशीर आणि भावुक शायरींचा प्रवास
आजही टिकून असलेला वारसा
स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या काळातही या अनोख्या कल्पनेने लोकांची मने जिंकली. आज हा ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचला असला, तरी त्यांचा हा सामाजिक सलोख्याचा संदेश आणि तोच ऐतिहासिक लोगो आजही कायम आहे. या एका चहाच्या ब्रँडने केवळ व्यवसाय केला नाही, तर चहाच्या कपातून समता आणि बंधुभाव रुजवला, हेच वाघ बकरी चहाचे खरे यश आहे, म्हणायला हरकत नाही.






