File Photo : Crime
इचलकरंजी : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.7) उघडकीस आली. पतीने पत्नीवर कोयत्याने चेहर्यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केला. मनिषा दिलीप धावोत्रे (वय ४०, रा. स्वामी मळा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती दिलीप मनोहर धावोत्रे (वय ४५) हा घटनेनंतर स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मनिषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे (रा.ओगलेवाडी ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
हेदेखील वाचा : Akshay Shinde Encounter: ‘… त्यामुळे आम्हाला केस लढवायची नाही’; अक्षयच्या पालकांची भूमिका, कोर्टात काय घडलं?
स्वामी मळा परिसरात राहणार्या दिलीप धावोत्रे याचा सन २०१० मध्ये ओगलेवाडी येथील मनिषा हिच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. धावोत्रे पती-पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात काम करत होते. दिलीप हा पत्नी मनिषा हिच्यावर वारंवार चारित्र्यावरुन संशय घेत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन दिलीप हा मनिषाला मारहाणही करत होता. मुलांनाही मारहाण करुन त्रास देत असल्याने काही वर्षांपासून दोन्ही मुले कराड येथे मावशीकडे शिक्षणासाठी जाऊन राहिले होते.
मनिषा हिने पतीकडे दारु सोडण्यासाठी तगादा लावला होता. दोन दिवसांपूर्वी दिलीप हा पंढरपूर येथे दारु सोडण्याचे औषध आणण्यासाठी गेला होता. तो बुधवारी परतला. गुरुवारी रात्री दिलीप आणि मनिषा यांच्यात पुन्हा वाद झाल्याची शक्यता आहे. त्यातूनच मनिषा ही झोपली असताना पहाटेच्या सुमारास दिलीप याने अत्यंत निर्दयपणे कोयत्याने मनिषाच्या चेहरा, गळा व मानेवर वर्मी वार केले. आठपेक्षा अधिक वर्मी वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. खूनानंतर दिलीप हा स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसही हडबडून गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेदेखील वाचा : 5 हजारांची लाच घेणं भोवलं; एसीबीने ‘जीएसटी’ कार्यालयातील कर निरीक्षकाला रंगेहात पकडलं