लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला (फोटो सौजन्य-ChatGPT)
२६ जून रोजी रहीमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पथकासह विवाहस्थळी धाव घेतली. मंदिरात विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि सुमारे २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. विवाहविधी सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून संपूर्ण सोहळा थांबवला. त्यानंतर मुलीच्या जन्मतारखेची आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तपासात मुलीचे वय केवळ १५ वर्षे ३ महिने असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे किमान विवाहयोग्य वय १८ वर्षे असल्याने पोलिसांनी तातडीने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
पोलिसांनी कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सातारा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने बालिकेला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका घोषित करत तिच्या शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलीचा विवाह लावणे, त्यासाठी मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारात सहभागी होणारे पालक, नातेवाईक, भटजी, मंडप व्यावसायिक किंवा इतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा १०९८ चाइल्डलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ही उल्लेखनीय कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली. या संवेदनशील आणि समाजहिताच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. एका अल्पवयीन मुलीचे बालपण वाचवणारी ही कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून समाजाप्रती असलेली पोलिसांची संवेदनशील बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली आहे.
बालविवाह केल्यास आता होणार कैद; महाबळेश्वर प्रशासनाचा कडक इशारा






