सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पुण्यातील कोथरुडमध्येही गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. सोनसाखळी हिसकावणे, लुटमार, खुनाचा प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने यांना निवेदन देऊन गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे.
पोलीस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात गुरनानी म्हणाले, सुसंस्कृत पुण्याचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू म्हणजे कोथरूड हा परिसर. कोथरुडमध्ये राहण्यासाठी अनेक युवा तसेच अबालवृद्ध अवघ्या महाराष्ट्रातून येतात व आपापल्या परीने कष्ट करून जीवन जगण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी धडपडत असतात. मागच्या काही वर्षात सुसंकृत कोथरूडमध्ये गुंडगिरी, गँगवॉर, हफ्ते वसुली, दुकानफोडी, घरफोडी, साखळी चोरी, महिलांवर अत्याचार, कोयता गँग प्रकरण अशा अनेक गुन्हेगारी कृत्यांचा जणू सुळसुळाटच अनुभवायला मिळत आहे. या कृत्यांमुळे सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण होत चालली आहे. आणि हेच या समाजातील अराजक तत्त्वांचे लक्ष्य आहे. या जाचातून जर कोथरूडला कोणी मुक्त करू शकते तर ते आहे आपले कर्मवीर आणि कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्र आणि पुणे पोलिस. या कोथरूडचे रक्षण करण्याची जबाबदारी कोथरूडचे पोलिस निरीक्षक या नात्याने परमेश्वराने आपल्या खांद्यावर टाकली आहे आणि याच कारणाने येथील जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे.
या कोथरूडच्या असंख्य सामान्य जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो की, कठोरातली कठोर कारवाई करून आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हेगारांचे संबंध कुठल्याही राजकीय पक्षाशी, प्रतिष्ठित व्यक्तींशी किंवा धनाढ्य व्यक्तींशी असले तरीही त्याची कुठलीही गयावया न करता, कोथरूडला या त्रासातून एकदाचे मुक्त करा व कोथरूडला गत वैभव, समृद्धी व शांतता प्राप्त करून द्या. असे केल्यास येथील जनता व मी आपले सदैव ऋणी राहू, अशी मागणी गुरनानी यांनी निवेदनातून केली आहे.