
श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली 'ही' मोठी शिक्षा
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या श्रीनिवास बालाजी पवार हत्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ तुषार आगलावे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुख्य आरोपी रणजीत अंगूर पवार याला ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड, तर अन्य तीन आरोपींना प्रत्येकी एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. डुकराच्या शिकारीच्या मटणाच्या पैशांवरून झालेल्या क्षुल्लक वादातून ही घटना घडली होती.
२८ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी रणजीत पवार व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी बालाजी हारलाल पवार यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव केला. यावेळी त्यांनी श्रीनिवास पवार याला शिवीगाळ करून काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान श्रीनिवासचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३/२०२२ दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने मुख्य आरोपी रणजीत अंगूर पवार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (भाग २) अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच अंगुर बाटु पवार, मीनाबाई अंगूर पवार आणि वंदनाबाई अंगुर पवार या तिघांना प्रत्येकी एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुराव्यामुळे शिक्षा
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रायल मॉनिटरिंग सेल’च्या प्रभावी समन्वयामुळे तसेच तपासातील भक्कम पुराव्यांमुळे आरोपींना शिक्षा मिळाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कपील आगलावे यांनी केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मोहम्मद अब्बास यांनी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडली. पोलीस उपनिरीक्षक नईम खान आणि पोलीस हवालदार आर. जी. गुटलवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.