
विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ही मोठी शिक्षा
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घडना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाह मोडल्यावरुन तरुणीवर चाकूने वार करुन खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. आरोपी शेखचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश पेठ) हिच्याशी २०१८ मध्ये विवाह निश्चित करण्यात आला होता. काही कारणांवरुन विवाह मोडल्याने शेख तरुणीवर चिडला होता. २३ जुलै २०१९ रोजी गणेश पेठेतील तरुणीच्या राहत्या घरात आरोपी शेख शिरला. त्याने तिच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी तिची आई फैमिदा (वय ४५) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेखने नाझनीनच्या आईवर चाकूने वार केले. त्याने केलेल्या हल्ल्यात फैमिदा जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान नाझनीनचा मृत्यू झाला.
फैमिदा यांनी फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद होता. याप्रकरणी शेख याला अटक करण्यत आली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. नाझनीनची आई फैमिदा आणि शेजाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ‘आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी’, अशी विनंती सरकारी वकील पवार यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चाकूवर आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, आरोपीने तरुणी तसेच तिच्यावर आईवर हल्ला केला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाने बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला. चाकू रक्ताने माखला असल्याने बोटांचे ठसे पुसले जाण्याची दाट शक्यता असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला.
हे सुद्धा वाचा : ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा