संग्रहित फोटो
न्हावरे : ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे तब्बल 760 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ऑक्टोबर-2025 मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे 415 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या क्षेत्रावरील पंचनामे त्यावेळी तात्काळ पूर्ण झाले असले तरीही प्रत्यक्ष मदत वितरणात मोठा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करून निधीला मान्यता दिली होती, मात्र प्रत्यक्षात सुमारे 70 लाख रुपयांची मदत अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अहवालानुसार,आतापर्यंत केवळ 60 टक्के शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून, उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शासनाने 15 दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अनेक महिन्यांनंतरही निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकत्याच मार्च-2026 च्या सुरुवातीला पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. मागील मदत न मिळाल्याने नव्या संकटांपुढे शेतकरी हवालदिल झाला आहे.
“नैसर्गिक आपत्तीची मदत वेळेत न देणे म्हणजे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य सुभाष कांडगे यांनी व्यक्त केली. तसेच प्रलंबित मदत शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही कांडगे यांनी दिला आहे.
सुभाष कांडगे यांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यावरही गंभीर आरोप करत महसूल विभागाच्या दिरंगाईमुळेच मदत रखडल्याचे स्पष्ट केले. तर, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी कृषी विभागाकडील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, शासन आता या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.






