
धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक केली आहे. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्यात हजर केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा चिंचपूर खुर्द येथील खून प्रकरणाची नोंद आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड हा घटनेनंतर फरार होता. दरम्यान, आरोपी कर्नाटक बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार विशेष पथक बसवकल्याण येथे रवाना करण्यात आले.
बसवकल्याणातून मुख्य आरोपीला अटक
माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पथकाने तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या अटकेमुळे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही नामंजूर करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेल्या तपासणीत काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे तसेच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. यानंतर प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीअंती पाच परवानाधारकांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.