संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे, राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे प्रकार सुरूच असून, त्यातच शेअर मार्केटमधील गुंतवुणकीच्या बहाण्याने दोघांना तब्बल ४६ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्हॉट्अॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून तिला शेअर मार्केटमध्ये गुुंतवणुक करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या खात्यात तब्बल २९ लाख ७ हजार भरण्यास सांगितले. त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणार्या महिलेनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २१ एप्रिल २०२५ ते २० जून २०२५ दरम्यान घडला आहे.
दुसर्या गुन्ह्यात शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने व चांगला परतावा मिळेल असे अमीष दाखवून एकाची १६ लाख ९७ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय खराडी येथील तक्रारदाराने तक्रार दिली आहे. हा प्रकार २३ मार्च २०२५ ते ८ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन घडला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहतात. १६ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले. महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या ५ महिन्यात महिलेने वेळोवेळी ४० लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मुद्दल दिली नाही. त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.