
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हुनर हाली हिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. ‘छल: एक शह और मात’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘थपकी प्यार की’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री हुनर हाली आणि मयंक गांधी लग्नाच्या नऊ वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. त्यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते आणि आता २०२६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी २०२५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या निर्णयामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “न्यायालयीन कामकाज संपले तेव्हा हुनर एका दृश्याचे चित्रीकरण करत होती. ती चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे, तिला त्यावेळी तिचा फोन तपासता आला नाही. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हणताच, तिने तो मेसेज पाहिला आणि तिच्या कायदेशीर टीमने तिला कळवले की तिचा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून ती भावुक झाली. तो मेसेज पाहताच, ती सेटवरच ढसाढसा रडली. तिच्या आजूबाजूच्या लोकांना माहीत होते की तो दिवस तिच्यासाठी किती महत्त्वाचा होता.”
हुनरच्या वकिलाने सांगितले, “होय, घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वैवाहिक वादांमध्ये अनेकदा घडते त्याप्रमाणे, घटस्फोटाच्या तडजोडीशी संबंधित काही मुद्दे होते ज्यांचे निराकरण करणे आवश्यक होते. सततच्या चर्चा आणि कायदेशीर प्रक्रियेतून, दोन्ही पक्ष परस्पर संमतीने एका करारावर पोहोचले.”
टीव्ही अभिनेता-अभिनेत्री हुनर हाली आणि मयंक गांधी यांनी ऑगस्ट 2016 मध्ये पारंपरिक शीख पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नसोहळ्याची त्या काळात मोठी चर्चा झाली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. चाहत्यांमध्ये ही जोडी विशेष लोकप्रिय होती. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षांनंतर आता दोघांनी आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, हुनर हालीने ‘पटियाला बेब्स’, ‘परमावतार श्री कृष्ण’, ‘तेरा मेरा साथ रहे’ आणि ‘दीवानी’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर मयंक गांधी ‘अदालत’, ‘तेरी मेरी गल बन गई’ आणि ‘काला टीका’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखला जातो.मनोरंजन विश्वातील या लोकप्रिय जोडीच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.