( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तिकळी, काजळमाया आणि देवमाणूस २ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या तिच्या ‘घबाडकुंड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने तिच्या आयुष्यात घडलेला एक भीतीदायक अनुभव शेअर केला आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवीला, “तुझ्या आयुष्यात कधी एखादा रहस्यमय किंवा थरारक अनुभव आला आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्रीने एक असा किस्सा सांगितला, जो ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येईल.
वैष्णवीने सांगितलं की,”एका प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी आम्ही कोल्हापूर की नागपूरला जात होतो. नेमकं लोकेशन आता आठवत नाही. प्रवासादरम्यान आमची गाडी एका पेट्रोल पंपावर थांबली. त्या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण मोकळी जागा होती. तिथे मला एक माणसासारखी आकृती सतत फेऱ्या मारताना दिसली.”
ती पुढे म्हणाली, “मी गाडीत झोपले होते. बाकीचे मला म्हणाले, खाली ये… तिथे बघ काहीतरी आहे. मी खाली उतरले आणि त्या दिशेने पाहिलं. मग आम्ही कोण आहे हे पाहण्यासाठी थोडं पुढे गेलो. पण, त्या आकृतीकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. ती फक्त तशाच फेऱ्या मारत होती. ते पाहून माझी धडधड वाढली. मी लगेच म्हटलं, ‘आता यापुढे मी जाणार नाही.’ त्यानंतर आम्ही तिथून निघालो.”
वैष्णवीने सांगितलं की, गाडीत बसल्यानंतरही तिचं लक्ष त्या आकृतीकडेच होतं. “गाडी निघाल्यानंतरही ती आकृती तशीच फेऱ्या मारताना दिसत होती. त्यानंतर आम्ही रात्री हॉटेलवर पोहोचलो. मी एकटीच मुलगी असल्याने मला वेगळी रूम देण्यात आली होती. रात्री साडेबारा वाजले होते, पण मी पाहिलेल्या त्या प्रसंगाचा भास सतत होत होता,” असं तिने सांगितलं.
वैष्णवी पुढे म्हणाली, “डोळे बंद केल्यावर तेच भास होत होते. मला डोळे बंद करायचीही भीती वाटू लागली होती. मी देवाचं नाव घेत झोपण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या झोप लागत नव्हती. ” भीती इतकी वाढली की, शेवटी तिने रात्री अडीच-तीनच्या सुमारास पती आणि अभिनेता किरण गायकवाड याला फोन केला. “मी किरणला फोन करून सांगितलं की, मला खूप भीती वाटतेय आणि सतत विचित्र भास होत आहेत. त्यावेळी किरण सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळत होता. त्याने मला सल्ला दिला की, खोलीतील सगळे दिवे सुरू कर आणि शांत झोपण्याचा प्रयत्न कर,” असं वैष्णवीने सांगितलं.
मात्र, खोलीतील सर्व लाइट्स सुरू करूनही तिची भीती कमी झाली नाही. “सगळे दिवे लावले तरी मला झोपायची हिंमत होत नव्हती. शेवटी सकाळी साडेसहा वाजता कुठेतरी झोप लागली. त्यानंतर आठ वाजता उठून आवरलं आणि प्रमोशनसाठी गेले,” असा खुलासा अभिनेत्रीने केला.
वैष्णवीने सांगितलेला हा अनुभव ऐकून अनेक चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, तिचा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहे.






