
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका दूरचित्रवाणीवरून बंद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या पुनरागमनाची माहिती दिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे.
मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ही मालिका २० जून पासून सुरू होणार असून. ही मालिका कुठे पाहायला मिळणार, कधी सुरू होणार या सगळ्याविषयी ते बोलले आहेत
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. ही मालिका बंद झाली तेव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे एक अचाट धाडस करण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्राचा DNA रडणारा नाही, तर लढणारा आहे.”
डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, 20 जूनपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा सुरू होत असून 20 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मालिकेचा प्रीमियर होणार आहे. ही मालिका ‘मराठी वारसा’ या YouTube चॅनलवर प्रदर्शित केली जाणार आहे.मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी ऐतिहासिक मालिका अशा पद्धतीने YouTube वरून पुढे नेण्याचा प्रयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “हा आपला इतिहास आहे, हा आपला अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
त्यामुळे नव्या ढंगात आणि आणखी दिमाखात ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा सुरू होत आहे,” असे ते म्हणाले.तसेच, आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. मालिका जिथे थांबली होती, तिथून पुढील संपूर्ण इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे, तो धगधगता इतिहास आता पुन्हा तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. तुमचं प्रेम आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झालं आहे,” अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.